शिर्डी (वृत्तसंस्था) वाढीव वीज बिलांविरोधातील आंदोलनावेळी कोपरगाव येथील वीज महामंडळाच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सरकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, असे आरोप या कार्यकर्त्यांवर करण्यात आले आहेत. पाच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी वीज कार्यालयातील तोडफोडीनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. यावेळी वीज वितरणचा एक कर्मचारीही जखमी झाला होता. वाढीव वीज बिलांविरोधात मनसेकडून आज राज्यभरात आंदोलने करण्यात आली. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र, सरकारचा आदेश झुगारून राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरताना दिसले. यापैकी मुंबई आणि ठाण्यातील मोर्चामध्ये मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. ठाण्यात पोलिसांकडून मनसेचा मोर्चा अडवण्यात आला. त्यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत बॅरिकेट्स फेकून दिल्या. ‘ठाकरे सरकार हाय हाय’, ‘मनसे जिंदाबाद’, ‘राज ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो’, अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यामुळे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत बाचाबाची केली. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मनसे नेते अभिजीत पानसे, अविनाश जाधव आणि रवी मोरेंसह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.
















