मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या २५ दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला असून हे तिघेही उद्या तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्यनचा न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर कोर्टाने त्याला जामीन दिला आहे.
सलग तीन दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. यादरम्यान विविध मुद्द्यांना अनुसरून युक्तिवाद मांडण्यात आला. ज्यानंतर गुरुवारी उच्च न्यायालयानं दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर जामीन मंजूर केला. ड्रग्ज केस प्रकरणी कोठडीत असणाऱ्या तिघांच्याही सुटकेचे आदेश शुक्रवारी किंवा शनिवारी मिळणार असून तेव्हाच ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती बचावपक्षाच्या वकिलांनी दिली. दरम्यान सदर प्रकरणी आता एनसीबी पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. तूर्तास शाहरुख खानला मोठा दिलासा मिळाला असून, आता त्याच्या मुलाची म्हणजेच आर्यन खानची दिवाळी मन्नतवरच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
न्यायालयात नेमकं काय घडलं?
आरोपींकडे असणारे ड्रग्ज आणि कटकारस्थान या मुद्द्यांवर एनसीबीला युक्तिवाद करता आला नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये माजी मदाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी आपला युक्तीवाद मांडत हे कटकारस्थान कसं, जेव्हा आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत, ड्रग्जची कमर्शिअल क्वांटीटी पाच-सहा जणांना मिळून दाखवण्यात आली होती. पण, यातला कोणीच एकमेकांना ओळखत नव्हता मग हे कटकारस्थान कसं असा प्रश्न आर्यनच्या वकिलांनी मांडला होता. ज्यानंतर न्यायाधीशांचं समाधान झालं आणि त्यांनी Allowed या एका शब्दात आर्यनचा जामीन मंजूर केला.