चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगावमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने बंद पाडलेल्या कीर्तनावरून वाद निर्माण झालाय. शहरातील एका कीर्तन सोहळ्यात पोलीस निरीक्षकाने दबंगगिरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पोलीस निरीक्षकाने वारकऱ्यांना दमदाटी केल्याचा आरोप आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागितली आहे.
चाळीसगावमधल्या सप्तश्रृंगी मंदिराजवळ रात्रीच्या वेळेला माइक व स्पीकर लाऊन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी शहर पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी सुरू असलेले कीर्तन बंद केले. वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा विषय असेलल्या नारदांच्या गादीवर ते बूट घालून वर चढले. तसेच वारकरी संप्रदायाला खडेबोल सुनावले, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस निरीक्षकांचा तसा एक फोटोही व्हायरल झाला आहे. त्यांनी कीर्तनकारासह वारकऱ्यांना मारहाण करण्याची धमकीही दिली. यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
चाळीसगाव शहरातील हनुमानसिंग नगरात दरवर्षी प्रमाणे यंदाही सप्तशृंगी मातेच्या वर्धापन दिनानिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सातव्या दिवशी सोमनाथ महाराज जपे यांची कीर्तनसेवा होती. कीर्तन सुरू असताना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील हे त्याठिकाणी आले. त्यांनी लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून नियमावलीचे कारण देत वारकऱ्यांशी अरेरावी केली. ते एव्हढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी वारकऱ्यांना मारहाण करण्याची धमकीही दिली, असा आरोप वारकऱ्यांनी केला आहे.
पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी मागितली वारकरी संप्रदायाची जाहीर माफी !
गेली दोन वर्ष कोविड मुळे कीर्तन बंद होते, चाळीसगाव तालुक्यात आता कुठे काही प्रमाणात कीर्तन सप्ताह सुरु झाले असून त्यासाठी पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांची वेळोवेळी मदत झाली असल्याचे उपस्थित कीर्तनकार व मान्यवर यांनीदेखील मान्य केले. के.के.पाटील यांच्याकडून ही चूक अनवधानाने झालेली असल्याचे त्यांनी मान्य केल्याने व वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागितली आहे.
चुकीबद्दल के.के.पाटील यांना मोठ्या मनाने माफ करावे : आमदार मंगेश चव्हाण
मी स्वतः वारकरी पुत्र असल्याने माझ्याही भावना दुखावणे साहजिकच होते. मात्र तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांचे काम, त्यांनी शहरातील अवैध धंधे, मुलींची छेड गाडणारे गावगुंड यांचा केलेला बंदोबस्त व आजवरची त्यांची कामगिरी माझ्यासह चाळीसगाव शहराने अनुभवली असल्याने या सर्व विषयावर पडदा पडावा. तसेच त्यांना मोठ्या मनाने माफ करावेम असेही आ. चव्हाण यांनी म्हटले आहे.