पुणे (वृत्तसंस्था) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. ते १०० वर्षांचे होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र आज एका इतिहास पूत्र मुकल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना न्युमोनिया झाला होता, त्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते, त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, अशी माहिती बाबासाहेब यांचा मुलगा अमृत पुरंदरे यांनी दिली. पण उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अलीकडेच पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील सर्वच नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होता.
कोण होते बाबासाहेब पुरंदरे?
बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे असं त्यांचं पूर्ण नाव होतं. त्यांचा जन्म जुलै १९२२ मध्ये झाला होता. पुरंदरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड होतं. तरुणपणापासून ते पुण्यातच स्थायिक झाले. त्यानंतर भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेतून कामाला सुरुवात केली. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर २०१५ सालापर्यंत बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.
बाबासाहेब पुरंदरे यांनी ऐतिहासिक विषयांवर ललित लेखन केलं. त्याचबरोबर त्यांनी नाट्यलेखन आणि जाणता राजा नाटकाचे दिग्दर्सन केले. २०१५ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर २०१९ मध्ये पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरंदरे यांनी लिहिलेल्या जाणता राजा या महानाट्याचे राज्यभरात हजारो प्रयोग झाले. तब्बल २७ वर्षांत १२५० हून जास्त प्रयोग झाले. या नाटकाचे हिंदी आणि इंग्रजीसह इतर ५ भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.
















