जळगाव (प्रतिनिधी) भडगाव, मुक्ताईनगर, चाळीसगाव, व जळगाव या चार तालुक्यात शालेय पोषण आहाराचा योजनेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे या अपहाराची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, खडसेंच्या या मागणीमुळे बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
तीन वर्षापूर्वी भडगाव, मुक्ताईनगर, चाळीसगाव व जळगाव या चार तालुक्यांमध्ये पोषण आहारात झालेल्या अपहार बाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पत्रात म्हटले आहे की, वरील चार तालुक्यांमध्ये जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत धान्य माल व तांदूळ वाटपामध्ये अधिकाऱ्यांनी ठेकेदाराची संगणमत करून आर्थिक अपहार केलेला आहे. याप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने ही कुठल्याही नोंदी नोंदविल्या नाहीत. या सर्व प्रकरणामध्ये पावत्यांवर योग्य ती दुरुस्ती न करता पुरवठादारास फायदा पोहचविण्यास कारणीभूत ठरणारे मुख्याध्यापक दोषी आहेत. असे असताना जिल्हा परिषदेच्या सीईओंनी पुरवठादाराला वाचविण्यासाठी याप्रकरणातील सर्वांनी क्लीनचिट दिली आहे. तरी या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी पत्राद्वारे केली आहे.