धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील खर्दे बू. येथे सार्वजनिक समितीच्या वतीने ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन येथील बुद्ध विहारात करण्यात आले. तत्पूर्वी, कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार राजू बाविस्कर, अशोक वानखेडे आदी मान्यवरांनी बुध्द वंदना घेवुन भ. गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी सम्राट अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाबद्दल सुरेश वानखेडे यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. तद्नंतर अशोक वानखेडे यांनी बुद्धांचा शांतीचा संदेश सांगितला, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला बौद्ध धम्म आपण नेहमीच आचरणात आणला पाहिजे. महापुरुषांच्या अनमोल विचारांचा वारसा प्रचार प्रसार करून निरंतर तेवत ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी नेहमीच वाचन केले पाहिजे, तरच आपल्याला महात्म्यांचा इतिहास माहिती होईल, असेही श्री. वानखेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
तद्नंतर अध्यक्षीय भाषणात पत्रकार राजू बाविस्कर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, आपण सर्वांनी सामाजिक भावनेतून एकत्र येऊन सर्वोत्तम कुणबी भूमिपुत्र भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, अहिल्यामाई होळकर, संत नामदेव, संत तुकोबाराय, छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे ह्या संत – महापुरुषांचे महान विचार ज्याप्रमाणे जगाने मान्य केले. त्याचप्रमाणे आपणही त्यांच्या मार्गाने, विचारांनी प्रेरित होऊन त्यांचे अपूर्ण कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. ज्याप्रमाणे सम्राट अशोक यांचे अशोक चक्र आपल्या तिरंगा ध्वजात, चार तोंडी सिंह हे भारतीय राष्ट्रीय चिन्ह म्हणून सरकार चालविते. आणि “सत्यमेव जयते” स्वीकारले आहे याप्रमाणे आपणही त्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी अविरत प्रयत्न करावा. तसेच, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देऊन ज्या महामानवांनी आपला उद्धार केला आहे त्यांना कधीच विसरू नका, असे आवाहन आपल्या मनोगतातून राजू बाविस्कर यांनी उपस्थितांना केले.
यावेळी धरणगाव येथील पत्रकार राजेंद्र वाघ, गणेश कोळी, धना वानखेडे, लोटन वानखेडे, भुरा वानखेडे, भास्कर कोळी, संदीप बिराडे, संजय वानखेडे, नाना वानखेडे, भगवान वानखेडे, रवींद्र वानखेडे आदी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वाघ यांनी तर आभार विजय पाटील यांनी मानले.