धरणगाव (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शहरात छापा टाकून बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त केल्यानंतर आता अनेक धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत. त्यानुसार ‘गंदा हैं…पर धंदा हैं ये’…म्हणत गुटखा माफिया आणि बनावट मद्य तस्कर या दोघं टोळींनी एकत्र येत धंदा वाढवायला सुरुवात केली होती. परंतू धंदा वाढणार तेवढ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापेमारी केल्यामुळे दोघं टोळ्या बिथरून गेल्या आहेत.
गुटखा माफियांसोबत एकत्र आले बनावट मद्य तस्कर !
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शहरात छापा टाकून बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त करण्याआधी शहरातील दोन टोळ्या एकत्र आल्या होत्या, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. त्यानुसार बनावट मद्य बनविल्यानंतर मालच्या तस्करीची जबाबदारी स्थानिक गुटखा माफियांकडे होती. अर्थात बनावट मद्य तस्कर आणि गुटखा माफिया या दोघं टोळींनी एकत्र येत काही दिवसांपासून पार्टनरशिपमध्ये हा गोरखधंदा सुरु केला अशीही चर्चा आहे. विशेष म्हणजे ज्या घरात बनावट दारू बनवली जात होती, ते घर भाड्याने देण्यासाठी शहरातील गुटखा माफियांनीच घर मालकाला तयार केले होते, अशी देखील चर्चा सुरु आहे.
पार्टनरशिपमध्ये सुरु होता गोरखधंदा
शहरात मागील दोन वर्षापासून बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरु होता. परंतू स्थानिक पातळीवर हे बनावट मद्य विकले जात नव्हते. त्यामुळे गावात पाहिजे तशी चर्चा होत नव्हती. परंतू काही महिन्यांपूर्वी बनावट मद्य कारखान्याबाबत उत्पादन शुल्क विभागाला टीप दिली जात होती. त्यामुळे धंदा करणे कठीण झाले होते. एवढेच नव्हे तर पाण्याच्या जारच्या नावाखाली सुरु असलेला उद्योग अनेकांना कळून चुकला होता. त्यामुळे जुन्या ठिकाणी धंदा करणे कठीण होऊन बसले होते. त्यामुळे आता धंदा पुन्हा सुरु करण्यासाठी आर्थिकसह राजकीय पाठबळ आवश्यक असल्यामुळे दारू तस्करांनी गुटखा माफियांसोबत पार्टनरशिप केली आणि काही दिवसांपासून बंद पडलेला हा गोरखधंदा पुन्हा सुरु झाला.
एका टोळीकडे माल बनविण्याची तर दुसरीकडे होती पोहचवण्याची जबबादारी
बनावट मद्य तस्करीत गुटख्यापेक्षा अधिक पटीने नफा असल्यामुळे दोघं टोळ्या एकत्र आल्या. एवढेच नव्हे तर गुटख्यासोबत आता बनावट मद्य देखील विक्री होत होते. दोघं टोळींनी आपापले काम विभागून घेतले होते. त्यानुसार बनावट दारू बनविण्याची जबाबदारी एका टोळीकडे तर दुसऱ्या टोळीकडे माल पाहिजे त्या ठिकाणी पोहचवण्याची जबाबदारी होती. बनावट मद्य धुळे, नंदुरबार परिसरात विक्रीसाठी जात होता. तर दुसरीकडे मध्य प्रदेशकडून गुटखा धरणगावात येत होता. थोडक्यात गावात बनलेली बनावट दारू बाहेर जिल्ह्यात तर दुसऱ्या राज्यातून आलेला गुटखा धरणगावात येत होता. ज्यापद्धतीने ट्रकभरून दारू बाहेर जाट होता. त्याचपद्धतीने कंटेनरभरून गुटखा धरणगावात खाली होत होता.