धरणगाव (प्रतिनिधी) परिस्थितीशी दोन हात केले तर यश आपोआप मिळतं असं म्हटलं जातं. याचचं एक आदर्श उदाहरण धरणगाव तालुक्यातील शेरी गावातील राहुल अशोक बेलदार या तरुणानं घालून दिलंय. वडिलांसोबत मिस्त्री काम करून प्रवासात, घरी वेळ मिळेल तिथं अभ्यास करून चौथ्या प्रयत्नात राहुलने अखेर मोठ्या संघर्षातून पीएसआय पदाला गवसणी घातलीच. मग काय गावकऱ्यांच्या आनंदालाही पारा उरला नाही. त्यांनी गावातून राहुलची जंगी मिरवणूकच काढली.
अगदी प्रतिकूल परिस्थितीत राहुलने अंगावर खाकी चढवण्याचे आणि अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. घरात साधा टीव्ही देखील नाही. बालपणापासून वेगवेगळ्या गावातील शाळेत शिक्षण घेऊन पदवी पूर्ण केली. धरणगाव आयटीआयमधून डीझेल मॅकनिकचा डिप्लोमा पूर्ण केला. तत्पूर्वी त्याने शेरी, बोराडी (शिरपूर), पथराड, चांदसर, धरणगाव अशा वेगवेगळ्या गावातून राहुलने आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं.
राहुलचे वडील मिस्त्री काम करतात. राहुलनेही अनेक वर्ष वडिलांसोबत गवंडी काम केलं. एकेदिवशी दीपस्तंभ कार्यक्रमात नियोजन मंडळाचे माजी सदस्य तथा माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांचे भाषण ऐकलं आणि आपणही अधिकारी व्हायचं असं राहुलने ठरवले. या कार्यक्रमानेच खऱ्या अर्थाने राहुलच्या जीवनाची दिशाच बदलवून टाकली. त्यानं काही मित्रांसोबत जळगाव गाठलं, अभ्यासिका लावली. पण परिस्थिती बेताची असल्यामुळे जेवण आणि राहण्याचा खर्च पेलवत नव्हता. शेरी गावातील एकाने सुचवलं की, तुमच्या सर्वांचे डब्बे गावातून जळगाव दररोज येणारा कुणीही घेऊन येत जाईल. राहुलसह त्याच्या मित्रांनी मग आपसात डब्बे आणायची ड्युटी आपसात वाटून घेतली. सकाळ, दुपार आणि रात्रीचाही डबा एकाच वेळी यायचा.
थोडे दिवस अभ्यास केल्यानंतर राहुलने एमपीएससी परीक्षा दिली आणि मंत्रालयात क्लार्क म्हणून नौकरीला लागला. पण आई-वडिलांना विश्वासच बसेना. बिना पैसे भरल्याशिवाय मुलाला चक्क मंत्रालयात कशी नौकरी लागेल?, असं त्यांना वाटायचं. पण थोड्या दिवसांनी विश्वास बसला. नंतरच्या काळात त्याचं लग्न झालं एक मुलगाही झाला. परंतू राहुलला मात्र पीएसआय व्हायचं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यामुळे मुंबईला मंत्रालयात नौकरी करत असताना लोकलमधून प्रवासादरम्यान, राहुलने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. युट्युबवर अभ्यासक्रमाशी निगडीत व्हिडीओ बघू लागला. पहिल्या तीन प्रयत्नात अपयश आले मात्र, राहुल खचला नाही. चौथ्या प्रयत्नात त्याने यशाला गवसणी घातलीच. पीएसआयचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सोहळा बघण्यासाठी नाशिकच्या ट्रेनिंगसेंटरला आल्यावर परिसर बघूनच राहुलचे आई-वडील आवक् झाले. त्यानंतर मुलाला परेड करतांना बघून दोघांनाही गहिवरून आले. तर माझ्या पठ्ठ्यानं करून दाखवलं…जिंकून दाखवल्याची चमक राहुलच्या वडिलांच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये स्पष्ट दिसून येत होती.
दरम्यान, आई-वडील मोठे भाऊ आणि काकांच्या मेहनतीने, आशिर्वादाने आपण इथपर्यंत पोहचू शकलो, असं राहुल नम्रपणे सांगतो. आता भविष्यात गरीब लोकांना कसा न्याय देता येईल, माझ्यासारखी ज्यांची परिस्थिती हलाकीची आहे, त्यांना कशी मदत करता येईल, याकडे मी लक्ष देईल. तसेच माझे लक्ष डीवायएसपी पदावर असून जसं-जसा वेळ मिळेल तसा मी पुन्हा अभ्यास करणार असल्याचेही राहुल म्हणतो. तसेच गावकऱ्यांनी माझी काढलेली जंगी मिरवणूक आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील, एवढेच नव्हे तर गावातील इतर विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळेल, असेही राहुल म्हणाला. गावकऱ्यांनी काढलेल्या मिरवणूकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी देखील राहुलचा संघर्ष आणि त्याच्या यशाचे तोंडभरून कौतुक केले.