जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला ऑनलाईन लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. आज झालेल्या लोकशाही दिनी एकूण ३७ तक्रार अर्ज दाखल झालेत. यामध्ये प्रामुख्याने तहसिलदार भुसावळ कार्यालयाकडे १२, तहसिलदार, जामनेर-४, तहसिलदार, रावेर-३, तहसलिदार, जळगाव- १३, तहसिलदार, पारोळा-२, तहसिलदार, यावल-१, तहसिलदार, अमळनेर-१, तहसिलदार पाचोरा यांचेकडे १ याप्रमाणे एकूण ३७ तक्रार अर्ज प्राप्त झाले.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनास उपवनसंरक्षक विवेक होशिंग, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, अग्रणी बँकेचे समन्वयक अरुण प्रकाश, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत बी. ए. बोटे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. तर तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, विविध विभागांचे प्रतिनिधींसह तक्रारदार नागरिक ऑनलाईन उपस्थित होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांनी मागील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले. आज प्राप्त अर्ज दाखल करुन घेण्यात आले असून सर्व संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठविण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिलेत. या अर्जावर संबंधित विभागांनी कार्यवाही करुन पुढील लोकशाही दिनात पूर्तता अहवाल सादर करण्याचे निर्देशही पाटील यांनी यावेळी दिलेत.