नागपूर (वृत्तसंस्था) मुंबईत अधिवेशन घेतलं की कोरोना कमी होतो आणि नागपूरमध्ये घेतलं की वाढतो. अशी कल्पना सरकारच्या सुपिक डोक्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारला नोबेल पुरस्कार द्यायला हवा, असा चिमटा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला काढला.
तसेच सरकारने यावर रिसर्च पेपर केला का? असा खोचक सवालही सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला केला. मागील काही दिवसांपासून हिवाळी अधिवेशनावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये घमासान सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याच्या विचार ठाकरे सरकारने केला आहे. तर, अधिवेशन नियमाप्रमाणे नागपुरातच व्हावे असा पवित्रा विरोधकांचा आहे. त्यावर माजी मंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वरील भाष्य केले. मुनगंटीवार म्हणाले, “विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपला. मात्र अजूनही सरकारने त्याची पुनर्रचना केली नाही. हिवाळी अधिवेशन देखील मुंबईत हलविलं आहे. या सर्व गोष्टींमुळे विदर्भावर अन्याय होत आहे. हे सरकार विदर्भावर अन्याय करणारं सरकार आहे.” तसेच, निदान विदर्भवाद्यांचं नेतृत्व करणाऱ्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीतरी याला विरोध करायला हवा होता; अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, हिवाळी अधिवेशन मुंबईला घेण्यात येणार असलं तरी मार्च महिन्यातील अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली.