नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथी मधला फरक ठाऊक आहे का?, असा खोचक प्रश्न गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी विचारला आहे. मेहसाणा येथील एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना रूपाणी यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर टीका केली.
२०१९ च्या निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने आम्ही सत्तेत आल्यास एपीएमसी कायद्यामध्ये बदल करु आणि शेतकऱ्यांना त्यांच्या ठरलेल्या बाजारपेठांच्या बाहेर शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देऊ. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाच बदल केला आहे तर काँग्रेस याचा विरोध का करत आहे?, असा प्रश्न रूपाणी यांनी उपस्थित केला. तसेच, “राहुल गांधींनी एका काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी एपीएमसीमधून भाज्या आणि फळांना हटवण्यात यावं. असं केल्यास त्यांच्या किंमती कमी होतील, असं मत व्यक्त केलं होतं. आता शेतकऱ्यांना सशक्त करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे तर काँग्रेस त्याचा विरोध करत आहे. काँग्रेसने अशी भूमिका का घेतली आहे याचं उत्तर लोकांना हवं आहे,” असंही रूपाणी पुढे म्हणाले.
काँग्रेस ज्या सुधारणांची वकीली करायची आज त्यालाच काँग्रेसकडून विरोध करुन राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय. “मी राहुल गांधींना विचारु इच्छितो, तुम्हाला कोथिंबीर आणि मेथी मधला फरक तरी ठाऊक आहे का?”, असं म्हणत रूपाणी यांनी काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधला. रूपाणी हे मेहसाणा येथे २८७ कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले नर्मदा पेयजल योजनेच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.