जळगाव (प्रतिनिधी) माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून याबाबतची माहिती आपल्यापर्यंत आलीच असेल. मात्र या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे. माझे सहकारी, यात शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती सदस्य सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आदींनी माझी अनुपस्थिती जनतेला भासू देऊ नका, असे भावनिक आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या प्रारंभीपासूनच सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने कोरोनाच्या प्रतिकाराची तयारी केली होती. तर, २८ मार्च २०२० रोजी जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा रूग्ण आढळून आला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजेच जवळपास एक वर्षापर्यंत मी कोरोनाच्या लढाईत थेट मैदानावर उतरून याच्या प्रतिकाराचे प्रयत्न केले. या दरम्यान, आम्ही शेकडो रूग्णालये आणि हजारो रूग्णांच्या थेट संपर्कात आलो. यामुळे आम्ही आधी देखील अनेकदा चाचण्या केल्या असता त्या निगेटीव्ह आल्या होत्या. आता मात्र कोरोनाने गाठलेच. पण असो, या लढाईत कोरोनावर मात करून पुन्हा लवकरच आपल्या सेवेत सादर होईल हा मनाशी ठाम विश्वास आहे.
मी सध्या मुंबई येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत असून आता प्रकृती चांगली आहे. यामुळे कुणी काळजी करू नका, आणि आपले माझ्यावर खूप प्रेम असले तरी, कृपया कुणी येथे भेटण्यासाठी येऊ नका. आणि हो, सर्वात महत्वाची बाब म्हणजे माझे सहकारी, यात शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती सदस्य सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आदींनी माझी अनुपस्थिती भासू देऊ नका. कोरोनामुळे आधीच अनेक कार्यक्रमांवर निर्बंध आले आहेत. यामुळे आपण सर्व नियमांचे पालन करा. सुरक्षित रहा, रूग्णांची मदत करा. मी काही दिवसांपर्यंत सार्वजनीक कार्यक्रम तसेच वैयक्तीक सुख-दु:खात सहभागी होऊ शकणार नाही. तेव्हा आपणच माझे प्रतिनिधीत्व करा. जनतेच्या मदतीसाठी धावून जा.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या प्रतिकारासाठी “मी जबाबदार ” ही दिलेली घोषणा पूर्णपणे लक्षात ठेवा, यानुसारच अंमलबजावणी करा ! लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनता या सर्वांच्या एकजुटीनेच आपण कोरोनाला हरविणार आहे. यामुळे मी आपल्यात काही दिवस नसलो तरी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी माझी अनुपस्थिती भासू देऊ नका हेच माझे कळकळीचे आवाहन आहे. मी लवकरच आपल्या सेवेत पुन्हा हजर होईल, तोवर कोरोना विरूध्दच्या लढाईची सूत्रे ही आपल्याकडेच असल्याचे समजून कार्यकर्त्यांनी जनसेवा करावी, हीच अपेक्षा…!, असे मत आज ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.