मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली असून त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवण्यात आल्याने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे. पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्ररित असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील रस्ते कामांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडीची नोटीस राजकीय हेतूने प्रेरित आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. राजकीय आकसापोटील या नोटीसा पाठवल्या जात आहेत. हे सर्व राजकीय आहे. महाविकास आघाडी त्याला घाबरत नाही. महाविकास आघाडी घट्ट आणि मजबूत आहे, असं सांगतानाच आम्ही देश आणि महाराष्ट्रासाठी काम करत असून आमचं काम सुरूच ठेवणार असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. “मी काही सांगत नसून सगळं भाजपाचे लोक सांगत आहेत. भाजपाचे लोक मला ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. कालपासून पाहतोय अजून कोणी आलेलं नाही. मी माझा माणूस भाजपाच्या कार्यालयात पाठवला आहे. कदाचित तिथे नोटीस अडकली असेल. तिथून त्यांच्या पक्षाचा माणूस निघाला असेल…तर पाहून घेऊ,” असा टोला त्यांनी लगावला. “हे सगळं राजकारण असून ज्यांना करायचं आहे ते करु शकतात,” असंही संजय राऊत यांना यावेळी सांगितलं. मी दोन वाजता शिवसेना भवनात बोलणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.