मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या महासाथीशी मुकाबला करत ही साथ आटोक्यात आणण्यात यश मिळत असताना आता राज्यावर साथींच्या आजाराचे संकट घोंघावत आहे. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे २५४ रुग्ण आढळले असून पावसाळी आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. तसेच मलेरियाचे रुग्ण वाढले असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात मलेरियाचे ५७६, गॅस्ट्रोचे २४७, लेप्टो ३२, डेंग्यू २५४, कावीळ ४१, चिकनगुनियाचे ३३ तर, ८ रुग्ण एचवानएनवनचे आढळले आहेत. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, प्रत्येक विभागात साथरोगबाबत जागरूकता वाढवली आहे. तसेच साथरोगाचे सर्वेक्षण, निदान आणि उपचारांवर भर देण्यात आला आहे. शिवाय, प्रत्येक रुग्णालय आणि दवाखान्यांना रक्त तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या वाढत्या प्रकरणांमुळे आता पालिका रुग्णालयातील बेड्स भरू लागले आहेत. विषाणूजन्य तापाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्टोबरमध्ये दररोज सरासरी १० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. मलेरियाचीही तीच स्थिती आहे. ऑक्टोबरमध्ये मलेरियाचे दररोज २१ रुग्ण आढळत होते. या वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयातील खाटा आरक्षित होण्याचे प्रमाण वाढले आहे.