मुंबई (वृत्तसंस्था) “मुंबईतील लिजवरील जमिनीवर असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांमधील मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने निर्णय घेतला. त्याला आघाडी सरकारने नुकतीच स्थगिती दिली होती. त्यानंतर मा. मुख्यमंत्र्यांनी ही स्थगिती उठवली. आम्ही या निर्णयाचे स्वागतच करतो. पण का स्थगिती दिली होती देव जाणे?”, असे त्यांनी लिहीले. या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतरही फाईलवरचे शेरे बदलले जातात म्हणून विचारले!”, असा टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाची राज्यात सत्ता असताना सरकारने जनहितार्थ घेतलेल्या सर्व निर्णयांना महाविकास आघाडी सरकार स्थगिती देत आहे असा आरोप भाजपा नेत्यांकडून सातत्याने केला जातो. मुंबई, ठाणे परिसरातील राज्य सरकारने दिलेल्या जमिनीवरील जुन्या सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी फडणवीस सरकारने एक निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला ठाकरे सरकारने स्थगिती दिली होती. परंतु आता स्थगिती उठवण्यात आली. या मुद्द्यावरून ट्विट करताना भाजपा आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. मुंबई व परिसरात गृहनिर्माणासाठी राज्य शासनाकडून हजारो भूखंड नागरिकांच्या सोसायट्यांना पूर्वी देण्यात आले होते. त्या जमिनींवरील सोसायटीमधील फ्लॅट विकायचा असल्यास किंवा जुन्या इमारतींचा पुनर्विकास करायचा असल्यास खूप किचकट प्रक्रिया करावी लागत होती. या समस्येवर तोडगा म्हणून फडणवीस सरकारने या जमिनी भोगवटादार वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये करण्यास ८ मार्च २०१९ रोजी परवानगी दिली होती. या निर्णयावर ठाकरे सरकारने आधी स्थगिती दिली आणि नंतर स्थगिती उठवली. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ट्विट केले.