जळगाव (प्रतिनिधी) माहे जून जुलै/ऑगस्ट २०२१ (उन्हाळी परीक्षा) ज्या विद्यार्थी/विद्यार्थीनीचे आई किंवा वडील अथवा दोघेही कोरोना (कोवीड-१९) च्या प्रादुर्भावामुळे मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी प्राचार्य/संचालक आणि विद्यापीठ शैक्षणिक प्रशाळा यांनी शिक्षण विभागप्रमुखांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, कोव्हिड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात आणि महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे शैक्षणिक संस्थांचे दैनंदिन कामकाज दि. २० मार्च, २०२० पासून विस्कळीत झालेले आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंम अर्थसहाय्यीत विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नीत महाविद्यालयातील नियमित वर्ग दि. १५ फेब्रुवारी, २०२१ पासून सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडील शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२१/ प्र.क्र.६/विशि-३ दि. ०३ फेब्रुवारी २०२१ अन्वये मान्यता दिलली होती. परंतू मार्च, एप्रिल, मे २०२१ महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने प्रत्यक्षात विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालये / परिसंस्था आणि विद्यापीठ शैक्षणिक प्रशाळा / विभागांमध्ये नियमित वर्ग सुरु झालेले नाही. त्यामुळे / शासनाच्या आदेशाने विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ह्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहे. असे असले तरी सध्या महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची वाढ होतांना दिसून येत आहे. यात भविष्यात सुधारणा होत गेली तरी राज्यातील काही भागात १०० टक्के कोरोना संपेल याची खात्री देता येत नाही.
सबब सध्यस्थितीत कोरोना (कोविड- १९) चा वाढता प्रादुर्भाव आणि आर्थिक मंदी लक्षांत घेता, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालये / परिसंस्था आणि विद्यापीठ शैक्षणिक प्रशाळा / विभागांमध्ये माहे जून, जुलै/ऑगस्ट २०२९ (उन्हाळी परीक्षा) परीक्षेस बसलेल्या ज्या विद्यार्थी/विद्यार्थीनींचे आई किंवा वडील अथवा दोघेही कोरोना (कोविड-१९) च्या प्रादुर्भावामुळे मयत झाले असतील, अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतलेला आहे.
तेव्हा, वरील बाब लक्षात घेवून आपल्या महाविद्यालय परिसंस्था आणि शैक्षणिक प्रशाळा/विभागांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थी / विद्यार्थीनीचे आई/वडील कोरोना (कोविड-१९) च्या प्रादुर्भावामुळे मयत झाले असतील अशा विद्यार्थी / विद्यार्थीनीचे प्रस्ताव ज्या बँक खात्यात परीक्षा शुल्क जमा करावयाचे आहे. त्यासाठी आवश्यक असणारे संबंधीताचा मयत दाखला, परीक्षा शुल्क भरल्याची पावती, बँकेचे नांव, बँकेचे खाते क्र., आय.एफ.एस.सी. कोडसह दि. १५ जुलै, २०२१ पर्यंत परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाकडे सादर करावेत, असे यात म्हंटले आहे.