छत्रपती संभाजी नगर (वृत्तसंस्था) फर्दापूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पळासखेडा (ता. सोयगाव) येथे बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा फर्दापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील दोन पुरुषांसह पाच महिलांना ताब्यात घेतले तर एक जण ५५ हजार रोख रक्कम घेऊन फरार झाला आहे. लग्नाचं वय झालेल्या तरुणांच्या घरच्यांना दलालामार्फत लग्न लावून पैसे उकळण्याचे काम ही टोळी करत होती. साधारणतः एका वधूची किंमत दीड लाख रुपये असायची, अशी माहिती समोर आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बनावट टोळीच्या माध्यमातून गुरुवारी (दि. १८) पळासखेडा येथील दोन तरुणांचे लग्न होणार होते. त्यातील एकाचे धनवट शिवारातील वाघूर नदीकाठी असलेल्या चौंडेश्वर महादेव मंदिरात लागले व दुसऱ्याचे लग्न पळासखेडा येथेच होणार होते. याबाबत नाशिकहून लग्नासाठी आलेल्या वराचा भाऊ पुरुषोत्तम नरोटे याला वधूवर संशय आला व त्याने याबाबतीत तिच्याकडे आधार कार्डची मागणी केली असता हे त्याला संशयास्पद वाटले. त्याने वधूला गावाशेजारील वाकोद (ता. जामनेर) येथे नेऊन आधारकार्डबाबतीत शहानिशा केली असता ते बनावट असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने हा घडलेला प्रकार फर्दापूर पोलिसांना कळविला त्यांनी तत्काळ या टोळीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोबाइल, बनावट आधारकार्ड व इतर साहित्य हस्तगत केले. तपासणीअंती या टोळीने या अगोदर अनेक लोकांचे बनावट लग्न लावून फसवणूक केलेली असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणातील आरोपी सीताराम महिपाल सोनवणे (रा. पहूर, ता. जामनेर), रोशनी अशोक पवार (रा. नाशिक, खरे नाव पुनिता शंकर कामटे, रा. बिहार), सुमन प्रकाश जाधव (रा. नाशिक, खरे नाव पूजा अनिल वाल्मीकी, रा. हडपसर पुणे), रंजना कैलास आलीस (रा. इंद्रकुंड पंचवटी नाशिक), मीरा अनिल डांगे, अनिल सुखदेव डांगे (दोघे रा. लोणी खुर्द ता. वैजापूर) रेणुका कमलाकर वस्त (रा. टिटवाळा, कल्याण) यांच्याविरुद्ध संजय बाळाराम साकळे (रा. पळासखेडा) यांच्या फिर्यादीवरून फर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. नीलेश लोखंडे, मकसूद तडवी, योगेश कोळी, कल्पना चाथे, कविता चाथे करीत आहे.
नातेवाईकांच्या माध्यमातून लग्नासाठी इच्छुक मुलाला हेरायचे
एखाद्या नातेवाईकांच्या माध्यमातून लग्नासाठी इच्छुक मुलाला हेरायचे. त्यांच्याकडून दीड ते दोन लाख रुपये हुंडा घेऊन लग्न करायचे. नंतर चार-पाच दिवस त्यांच्या घरी राहून, अंगावरील दागिन्यांसह तेथून पळ काढायचा व कटात सामील असलेल्या प्रत्येकाला वाटा द्यायचा. पुन्हा नवीन मुलाचा शोध घ्यायचा, अशी या टोळीच्या गुन्ह्याची पद्धत होती