जळगाव (प्रतिनिधी) मध्यरात्रीच्या सुमारास कुटुंबिय गाढ झोपेत असतांना अश्विनी विशाल चौधरी (वय २४, रा. किनोद, ता. जळगाव) या विवाहितेने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांचे पती पाणी पिण्यासाठी उठल्यानंतर उघडकीस आली. पत्नीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह बघताच त्यांनी आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील किनोद येथे अश्विनी चौधरी या विवाहिता कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी आपल्या कुटुबियांसोबत जेवण केल्यानंतर चौधरी कुटुंबीय झोपले. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अश्विनी यांनी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. पहाटे तीन वाजेच्या सुमारास पती विशाल चौधरी पाणी पिण्यासाठी उठले व त्यांना पत्नीने गळफास घेतल्याचे दिसले. पत्नीचा मृतदेह बघताच त्यांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर विवाहितेला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. मयत विवाहितेच्या पश्चात पती, दीड वर्षाचा मुलगा आहे.