नांदेड (वृत्तसंस्था) घरच्यांकडून लग्नास नकार मिळत असल्याने प्रियकराने प्रेयसीला विषारी द्रव्य पाजले. नंतर स्वतः ही आत्महत्येचा प्रयत्न केला. ही हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथे दि. ४ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सुप्रिया मारोती जाधव असं मयत तरुणीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, लक्ष्मीबाई मारोती जाधव आणि त्यांचा सख्खा चुलतभाऊ पद्माकर रामा जाधव हे दोघं भोपाळवाडी येथे वास्तव्यास आहेत. त्याचा मुलगा रोहिदास हा सुप्रियास अधूनमधून भेटायला घरी येत असे. ते दोघे अधूनमधून फोनवर बोलत असत व प्रत्यक्ष भेटतही असतं. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. मुलाच्या वडिलांनी मुलगा रोहिदासला तुझी मुलगी सुप्रिया हिला दे म्हणून लग्नासाठी मागणी घातली होती. परंतु लक्ष्मीबाई व नातेवाईकांचा विरोध होता. नंतर दि. ३ जुलै रोजी रात्री सुप्रिया एका खोलीत तर आई व आजी दुसऱ्या खोलीत झोपले होते.
दि.४ जुलै रोजी पहाटे ३.३० वाजता लक्ष्मीला जाग आली. त्यावेळी तिने सुप्रियाच्या खोलीचे दार काढून पाहिले असता ती दिसली नाही. म्हणून बाथरुममकडे जाऊन पाहिले असता दरवाजा आतून बंद होता. सुप्रिया सुप्रिया असा आवाज दिला असता ती बोलली नाही मात्र बाहेर आली. बाथरूममधूनच रोहिदास जाधव हा बाहेर आला व वाड्याचे दार काढुन तो पळून गेला. लगेच सुप्रियाला उलट्या होऊ लागल्या. त्यावेळी काय झाले, का उलट्या का होत आहेत असे लक्ष्मीने विचारले असता रोहिदासने मला स्प्राईटच्या बाटलीतून विष पाजले असे सांगितले. त्याचवेळी रोहिदासचा फोन आला आणि सुप्रियानेही तो फोन उचलला. तेव्हा रोहिदासने मी देखील विष पिलो आहे, मलाही उलट्या होत आहेत असे सांगितले.
लक्ष्मीबाई यांनी लागलीच सुप्रियाला रुग्णालयात दाखल केले. तसेच रोहिदासलाही त्याच्या आई-वडिलांनी दुसऱ्या वाहनात टाकून शासकीय रुग्णालयातच आणले. उपचारादरम्यान दि.४ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता डॉक्टरांनी सुप्रियाला मृत घोषित केले. तर रोहिदासवर उपचार सुरु आहेत. याबाबत लक्ष्मीबाई जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उस्माननगर पोलिस ठाण्यात रोहिदास याच्याविरुध्द भादंविच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.