नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या १८ दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा एकोणवीसावा दिवस आहे. आज सोमवारी शेतकरी कृषी कायद्यांविरोधात उपोषण करत आहेत. या शेतकरी आंदोलनालाअधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने आणखी १० हजार शेतकरी दिल्ली-हरयाणा सीमेवर पोहोचणार आहे.
राजस्थान सीमेवरून हजारो शेतकरी राजधानीच्या दिशेने कूच करण्याच्या तयारीत आहेत. आज सर्व शेतकरी संघटनांचे अध्यक्ष उपोषणाला बसणार आहेत. तसेच यादरम्यान, सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांच्या ठिकाणी धरणं आंदोलनही केलं जाणार आहे. शेतकरी नेते गुरनाम लिंब चढूनी म्हणाले की, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे उपोषण १४ डिसेंबरपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याच्याच योजनेचा हिस्सा आहे. चढूनी यांनी सिंघू बॉर्डरवर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, सर्व शेतकरी नेत आपापल्या ठिकाणी उपोषण करणार आहेत. रविवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दिल्ली-जयपूर महामार्गावर जयसिंह खेडाजवळ पोलिसांनी राजस्थानहून दिल्लीच्या दिशेने कूच करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखले. या मुळे तेथील वाहतूक देखील बंद झाली. शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता अलवर प्रशासनाने वाहतूक बेहरोर-तातरपूर खैरताल मार्गावर वळवली आहे. साडे तीन तासांनंतर दिल्लीहून आलेल्या वाहनांसाठी हा मार्ग मोकळा करण्यात आला. मात्र शेतकऱ्यांनी वाहतूक अडवलेली नसल्याचे राजस्थानचे शेतकरी नेते अमरा राम यांनी म्हटले आहे. आम्हाला रोखण्यासाठी पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्समुळे वाहतूक अडली असल्याचे ते म्हणाले. आम्हाला केवळ दिल्लीला जायचे आहे, असे ते पुढे म्हणाले.
कमीतकमी आणखी २००० ट्रॅक्टर येथे पोहचणार असल्याचे पहिल्या दिवसापासून सिंघू बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याने म्हटले आहे. प्रत्येक ट्रॅक्टरवर कमीतकमी चार लोक आहेत. दिल्लीचे गगनप्रीत सिंह हे आंदोलक शेतकऱ्यांना जेवण पुरवत आहेत. त्यांनी आपल्या मित्रांनाही सिंघू बॉर्डरवर बोलावले आहे.