धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय किसान मोर्चा अमळनेर व धरणगावच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. किसान विरोधी ३ अध्यादेश पारित केल्याच्या विरोधात गेल्या ५२ दिवसापासुन दिल्लीच्या सीमांवर शेतकरी ठाण मांडुन बसलेले आहेत.
१५ जानेवारी २०२१ म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील मताधिकाराचा दिवस. त्यामुळे शेतकरी कष्टकरी बहुजन बांधवांसाठी राष्ट्रीय किसान मोर्च्याच्या धरणे आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलनास प्रतिसाद कमी मिळेल असे वाटले होते. परंतु अमळनेर व धरणगावच्या शेतकरी व कामक-यांना या धरणे आंदोलनाचे गांभीर्य लक्षात आले. त्यांनी मताधिकार बजावला व तडक धरणे आंदोलन स्थळी आले. अमळनेर व धरणगाव तालुक्यातील शेतक-यांनी केंद्र सरकारने केलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले तीन कायद्यांविरोधात दिल्ली येथे आंदोलन करीत असलेल्या आपल्याच शेतकरी बांधवांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी धरणे आंदोलनात उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. किसान विरोधी ३ अध्यादेश पारित केल्याच्या विरोधात गेल्या ५२ दिवसापासुन दिल्लीच्या सीमांवर शेतकरी ठाण मांडुन बसलेले आहेत.
या किसान विरोधी कायद्यांच्या विरोधात व शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रीय किसान मोर्चा संपुर्ण भारतात ५५० जिल्ह्यात ११ जानेवारी ते १७ जानेवारी २०२०पर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. १५ जानेवारी रोजी अमळनेर व धरणगाव तालुक्यातील शेतकरी व मजुर कष्टकरी बंधुंनी धरणे आंदोलनात बहुसंख्येने सहभाग नोंदवला. अमळनेर तालुक्यातुन आलेल्या शेतक-यांचे नेतृत्व हिरालाल आप्पा पाटील, प्रा. विजय गाढे व प्रा. जितेश संदानशिव यांनी केले. धरणगाव तालुक्याचे नेतृत्व गोरख देशमुख व राजेंद्र वाघ (माळी) यांनी केले.
या दिग्गजांनी धरणे आंदोलनास भेट देऊन दिले राष्ट्रीय किसान मोर्चास दिले समर्थन – प्रतिभाताई शिंदे (संस्थापक अध्यक्ष लोकसंघर्ष मोर्चा), सचिन धांडे (सदस्य संयुक्त किसान मोर्चा जळगाव जिल्हा), मिर्झा मुश्ताक अहेमद साहब (जळगाव जिल्हा अध्यक्ष जमाते इस्लामी ए हिंद), मदन शिरसाठ (कोळी) (प्रवर्तन बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र) या सर्व मान्यवरांचे राष्ट्रीय किसान मोर्चा तर्फे आभार व्यक्त केले. प्रा. शिवाजीराव पाटील (राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा), चंद्रकांत जगदाळे (राज्याध्यक्ष, राष्ट्रीय किसान मोर्चा), विश्वासराव पाटील (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा) यांनी पाचव्या दिवशी धरणे आंदोलनाचे नेतृत्व केले.
















