नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नव्या कृषी कायद्याच्या विरोधात ८ डिसेंबरला ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीने बंदचे आवाहन केले आहे. बंदला काँग्रेससह २० पक्ष व १० कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. गेल्या १२ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.
९ डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. शेतकरी नेते बलदेवसिंग निहालगड यांनी सांगितले, सायंकाळपर्यंत बंद असेल. दुपारी ३ पर्यंत चक्काजाम राहील. अॅम्ब्युलन्स व विवाहाच्या गाड्यांना मुभा असेल. पंजाबचे खेळाडू, कलाकारांनी सोमवारी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी यामध्ये प्रमुख पक्षांचा समावेश आहे. राजस्थानचे खासदार आणि आरएलपीचे नेते हनुमान बेनीवाल यांनी तर 8 डिसेंबरनंतर एनडीएकडे रहायचे की नाही याबाबत आपण निर्णय घेणार असल्याचेही म्हटले आहे. केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे.
नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी येथे सुरू केलेल्या आंदोलनाला ११ दिवस झाले. सीमेवर सुमारे १ लाख निदर्शकांसाठी दिवस-रात्र लंगर सुरू आहे. यात ज्यूस, पिझ्झा, देशी तुपातील लाडू, जिलेबी, पाणीपुरी, बदाम-अक्रोड वाटले जात आहेत. राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या कित्येक मैल रांगा आहेत. काही शेतकरी तर परदेशातून आले आहेत. दर दहा पावलांवर एक लंगर आहे. यात भाज्यांमध्ये मटार-पनीर, आलू-गोबी, छोले-पुरी, पराठेही दिले जात आहेत. पंजाबमधील एका गावातून १५ टन देशी तूप आले आहे. मलेरकोटलाच्या मुस्लिम समाजाने व्हेज पुलावचा लंगर लावला आहे. रात्री थंडी वाजू नये म्हणून चादरी-ब्लँकेट, याशिवाय साबण, ब्रश, पेस्टही दिले जात आहे. गुरुदासपूरहून आलेले सविंदरपालसिंग यांनी सांगितले, ६५ दिवसांपासून आंदोलनाची तयारी सुरू होती. अनिवासी भारतीयांनीही प्रचंड मदत केली. आंदोलनस्थळी १५ वैद्यकीय शिबिरे आहेत.