जळगाव (प्रतिनिधी) सन २०२०-२१ करिता पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन २०२०-२१ पासुन कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी (ऐच्छिक) यांना विमा अर्जासोबत फळबागेचा जीओ टॅगींग केलेला फोटो अपलोड करणे आवश्यक राहील असे म्हटले होते. परंतु सद्य:स्थितीस जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतक-यांनी विमा अर्जासोबत फळबागेचा जीओ टॅगींग केलेला फोटो जोडण्यासंदर्भात साशंकता व्यक्त केली आहे.
या संदर्भात योजनेत सहभागी होऊ इच्छीणा-या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, अर्जदार शेतकरी विमा अर्जासोबत जीओ टॅगींग केलेल्या फोटोशिवाय विमा नोंदणी करु शकतात. मात्र शेतकऱ्यांनी याबाबतची पुर्तता पुढील कालावधीत लवकरात लवकर करुन देणे आवश्यक राहील. या संदर्भात विमा कंपनी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना जीओ टॅगींग केलेला फोटो काढून अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देईल. असे संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.