वपुणे (वृत्तसंस्था) २०२१ वर्षाचा शेवटी कोरोनाच्या (corona) नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले. त्यामुळे दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन काही दिवसात आटोपले. पण त्याचवेळी अनेक राजकीय नेत्यांच्या घरातील लग्नकार्य थाटामाटात झाली. त्यामध्ये झालेल्या गर्दीत अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली असून राज्यातील १० मंत्री (ministers), २० आमदार (mla) कोरोनाबाधित झाल्याने खळबळ उडाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्यातील कोरोना स्थितीबाबत त्यांनी माहिती दिली. ‘कोरोनाच्या बाबतीत कालच राज्य सरकारनं नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नियमांचं भान ठेवलं पाहिजे. लग्नसमारंभ आणि अशा प्रकारचे समारंभ मोठ्या स्वरूपात व्हावेत असं प्रत्येकाला वाटतं. परंतु, कोरोनाच्या नव्या स्वरूपातील विषाणूचा संसर्ग वेगाने होतो हे लक्षात घेतलं पाहिजे. पाश्चात्य देशात प्रचंड प्रमाणात बाधित रुग्ण सापडत आहेत. आपण दुसऱ्या लाटेची मोठी किंमत मोजली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताच्या काळजीपोटीच राज्यानं नियम कठोर केले आहेत. काही राज्यांनी रात्रीची जमावबंदी, टाळेबंदी केली आहे. राज्यात मुंबई आणि पुणे येथे कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळं सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं आणि कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन अजित पवार यांनी केलं. अर्थात, कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास आणखी कठोर निर्बंध लावावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
कोरोनाचा संसर्गा झालेल्यांमध्ये राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह काही अन्य काही मंत्री, आमदार आणि दिग्गज राजकीय मंडळींना कोरोनाची लागण झाली आहे.