जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वडली येथे शेतकरी कुटुंबातील तिघांनी कर्जबाजारीपणा कंटाळून एकाचवेळी विषारी औषध घेतल्याची धक्कादायक घटना घडली. शेतकऱ्यांने पत्नी मुलासह विषारी द्रव सेवन केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर त्यांची पत्नी आणि मुलाची प्रकृती गंभीर आहे. नारायण दंगल पाटील (वय ६६, रा. वडली ता. जळगाव) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर पत्नी भारती नारायण पाटील (वय ५५) आणि मुलगा गणेश नारायण पाटील (वय ३३) यांची प्रकृती चिंताजनक आहे.
जळगाव तालुक्यातील वडली गावात नारायण दंगल पाटील हे पत्नी भारती आणि मुलगा गणेश यांच्यासोबत वास्तव्याला होते. नारायण पाटील यांची शेती कर्जामुळे शेती विकावी लागली होती. तशात गणेश याची नौकरी देखील काही दिवसांपूर्वी गेल्याने तोही घरी होता. यामुळे नारायण पाटील यांनी फायनान्स तसेच इतर ठिकाणांहून कर्ज घेतले होते. डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्यामुळे नारायण पाटील, त्यांची पत्नी तसंच मुलगा तिघेही गेल्या काही दिवसांपासून ताणतणावात होते. याच तणावातून आज सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान नारायण पाटील, त्यांची पत्नी भारती पाटील आणि मुलगा गणेश पाटील या तिघांनी विषारी औषध सेवन केले. त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने गणेशने गावात राहणारा मित्र श्यामला फोन करून घरी बोलावले.
श्याम हा घरी गेल्यावर आई-वडिलांसह मुलगा गणेश हे तिघे गळ्यात गळा टाकलेल्या अवस्थेत दिसून आले. श्यामने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने तिघांना खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. उपचार सुरू असताना अवघ्या दोन तासांत तिघांपैकी नारायण पाटील यांचा उपचारादरम्यान सकाळी १० वाजता मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी भारती आणि मुलगा गणेश या दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.