जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या २२ ऑगस्ट, २०१७ च्या निर्णयानुसार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर, २०२१ या कालावधीत ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० चे नियम ५ (३) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापरावर श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार सन २०२१ वर्षामध्ये १५ दिवस निश्चित करून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुट जाहीर करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.
त्यानुसार पोलीस अधिक्षक, जळगाव यांनी जानेवारी ते डिसेंबर या काळात जिल्ह्यात सालाबादप्रमाणे सण व उत्सव साजरे होणार असल्याचे कळविले आहे. त्याप्रमाणे यावर्षातील खालील साजरे होणारे सण आणि उत्सवांना सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सुट देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे. रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वाजविण्यास सुट असलेले सण, उत्सव आणि त्यांच्या तारखा पुढीलप्रमाणे- छत्रपती शिवाजी महाराज जयंती- १९ फेब्रुवारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती-१४ एप्रिल, महाराष्ट्र दिवस-१ मे, गणेशोत्सव पाचवा दिवस-१४ सप्टेंबर, गणेशोत्सव सातवा दिवस- १६ सप्टेंबर अनंत चतुर्दशी- १९ सप्टेंबर, नवरात्रोत्सव अष्टमी-१३ ऑक्टोबर, नवमी-१४ ऑक्टोबर, ईद ए मिलाद- १९ ऑक्टोबर, दिपावली-४ नोव्हेंबर, ख्रिसमस-२५ डिसेबर, वर्षअखेर-३१ डिसेंबर. याशिवाय तीन दिवस राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सूट देतांना उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदुषणासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे व न्यायालयाकडील आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. ही सुट राज्य शासनाकडून घोषीत शांतता क्षेत्राला लागू नसल्याने त्याची जबाबदारी पोलीस अधिक्षक व आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका यांची राहिल. ध्वनीक्षेत्रक व ध्वनीवर्धक वाजवण्याकामी सूट दिल्यानंतर ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० मधील नियम ३ व ४ चे पालन करण्यात यावे. या नियमातंर्गत स्थापन केलेल्या प्राधिरणाने त्यांचेकडे प्राप्त तक्रारींवर मा. उच्च न्यायालयाने १६ ऑगस्ट, २०१६ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे विवित पध्दतीने कार्यवाही करणे आवश्यक आहे.
तरी जिल्ह्यातील नागरिकांनी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी मिळालेल्या सूटचा लाभ घेतांना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.