नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांनी लव जिहादबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे देशात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. “भारतात हिंदू मुली मुस्लीम मुलांना आपल्या जाळ्यात ओढतात. अशा पद्धतीने मुस्लिमांचे लव जिहादमुळे अधिक नुकसान होते, असे धक्कादायक वक्तव्य कुरेशी यांनी केले आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हिजाब वादावर बोलताना कुरेशी म्हणाले, हिजाब कुरानचा भाग नाही, पण मुलींनी शालीन कपडे परिधान करावेत हे सांगण्यात आलं आहे. शाळेच्या गणवेशामध्ये शिखांची पगडी आणि सिंदूर लावण्याची परवानगी आहे, मग हिजाब घालण्यास काय हरकत आहे? हिजाब आवश्यक आहे की नाही हे मौलवी ठरवतील, न्यायाधीश नाही. लव जिहादवर बोलताना कुरेशी म्हणाले, लव जिहाद हा एक प्रोपगंडा आहे. यात मुस्लीम मुलींना अधिक धोका आहे. कारण त्यांच्या नजरेतून पाहिलं तर शिकलेल्या हिंदू मुली मुस्लीम मुलांना आपल्या जाळ्यात ओढतात. अशा परिस्थितीत लव जिहादमुळे मुस्लिमांना अधिक नुकसान होतं.
ईव्हीएम हॅकिंगच्या मुद्द्यावरही कुरेशी यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, ईव्हीएम कायमच विश्वसनीय आहे. जर याच्याशी छेडछाड झाली असती तर पश्चिम बंगालमध्ये भाजपा निवडणूक जिंकला असतात. कुरेशी यांच्या या वक्तव्यांमुळे आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.