राहुरी (वृत्तसंस्था) तालुक्यातील एका ३५ वर्षीय महिलेला विविध प्रकारची आमिषे दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आला. याबाबत श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. सोमवारी मध्यरात्री माजी आ. मुरकुटे यांना त्यांच्या श्रीरामपूर येथील निवासस्थानावरून अटक करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील एक ३५ वर्षीय महिला श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या घरी शेतीकाम करत होती. यादरम्यान त्यांची ओळख झाली. यादरम्यान मुरकुटे यांनी पीडित महिलेला २०१९ मध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर महिलेला घर, शेती घेऊन देतो, तसेच मुलाला नोकरी लावून देतो, असे वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून तिच्यावर अहमदनगर जिल्ह्यात आणि मुंबई, दिल्ली अशा विविध ठिकाणी अत्याचार केला. या घटनेबाबत महिलेने सोमवारी सायंकाळी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. महिलेने फिर्याद दाखल करतेवेळी राहुरी पोलीस ठाणे येथे येऊन रात्री १० वाजण्याच्या सुमारास आरोपीने केलेल्या अत्याचाराचे व्हिडीओ व फोटो असे पुरावे दाखवल्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी गुन्हा दाखल केला.
फिर्यादीवरून माजी आमदार भानुदास काशिनाथ मुरकुटे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल होताच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, श्रीरामपूरचे उपअधीक्षक बसवराज शिवपुजे, राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख, उपनिरीक्षक समाधान साळुंके यांच्यासह राहुरी व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील तपास पथक व महिला पोलीस कर्मचारी अशा सुमारे २५ ते ३० पोलीस कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्याने मंगळवारी पहाटे मुरकुटे यांच्या निवासस्थानी धाड टाकून मुरकुटे यांना ताब्यात घेतले, अशी माहिती मिळाली आहे. त्यानंतर मुरकुटे यांची राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक करण्यात आली.
मुरकुटे यांना अटक झाल्याचे वृत्त श्रीरामपूरसह जिल्ह्यात वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर अनेकांनी राहुरीकडे धाव घेतली. मुरकुटेंना अटक करताच कार्यकर्त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. मुरकुटे श्रीरामपूर मतदारसंघात तीन वेळा आमदार म्हणून राहिले आहेत. अशोकनगरच्या अशोक सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत, यासह अशोक सहकारी बँकेचे चेअरमन व अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यातील राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने या घटनेबाबत जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.