चंद्रपूर (वृत्तसंस्था) गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील वर्धा नदीत खेकडे पकडायला गेलेली तीन शाळकरी मुले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास तोहगावजळील सिंधी घाटावर ही घटना घडली. आपल्या पोरांचा मृतदेह बघताच आई-वडिलांनी काळीज चिरणारा आक्रोश केला.
या संदर्भात अधिक असे की, तोहगाववरून तीन किलोमीटर अंतरावर वर्धा नदीचा सिंधी घाट आहे. तोहोगाव येथील प्रतिक नेताजी जुनघरे, निर्दोष ईश्वर रंगारी, सोनल सुरेश रायपुरे, आरुष प्रकाश चांदेकर ही १० ते ११ वयोगटातील चार मित्र खेकडे पकडायला गेले. त्यापैकी तीन जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. आरुष प्रकाश चांदेकर हा मुलगा मात्र पाण्यात न उतरल्याने सुखरूप घरी परत आला.
वाहून गेलेल्यांमध्ये प्रतीक नेताजी जुनघरे निर्दोष ईश्वर रंगारी, सोनल सुरेश रायपुरे या मुलांचा समावेश आहे. नदी पात्रावर त्यांचे कपडे व पादत्राणे सापडली आहेत. गावातीलच शेतात काम करणाऱ्या महिलेने तीन मुलांना पाण्यात वाहून जाताना बघितले. तेवढ्यात मित्रांना बुडताना बघून हादरलेला आरूष गावाकडे परतला.
दुर्घटनेची माहिती मिळताच गावाकऱ्यांनी लगेच नदीपात्राकडे धाव घेतली. पोलिसांनी देखील घटनास्थळी दाखल होत युद्धस्तरावर शोध मोहीम सुरू केली. आज (रविवार) पहाटे प्रतीक जुनघरे याचा मृतदेह घटनास्थळापासून दीड किमी अंतरावर सापडला. तर निर्दोष रंगारी, सोनल रायपूरे या मुलांचे मृतदेह आर्वी पुलाजवळ सापडले आहेत. मुलांचे मृतदेह बघून कुटुंबीयांनी काळीज चिरणारा आक्रोश केला. या घटनेने गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.