मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात रक्त टंचाईच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यावेळी राज्य सरकारच्यावतीने आरोग्यमंत्री टोपे यांनी शासकीय रुग्णालयात शनिवारपासून मोफत रक्त दिले जाणार असल्याची घोषणा केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह खासदार सुळे आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. अरूण थोरात आदी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताची टंचाई भेडसावत असून त्यामुळे विविध ठिकाणी रक्तदानाच्या शिबिरांचे आयोजन करण्यासाठी शासनातर्फे आवाहन केले गेले आहे. त्या अनुषंगाने आज दुपारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी टोपे यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि रक्तदात्यांनी रक्तदान केले.
‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार आरोग्यमंत्री टोपे यांनी रक्तदान करून त्याद्वारे नागरिकांना रक्तदान करण्याचा संदेश दिला. यावेळी आरोग्यमंत्रीटोपे म्हणाले, शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी ८०० रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्याला मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
















