जळगाव (प्रतिनिधी) राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेसारख्या नवीन योजनांमुळे आधीच्या अन्य योजनांचा निधी येणे बंद झाले आहे. संजय गांधी निराधार योजनेचा १६ महिन्यापासून निधी आलेला नाही, वृध्द भूमिहीन योजनेचा पैसा आलेला नाही, कलावंताच्या योजनेचा निधी नाही, स्व. गोपीनाथ मुंडेंच्या नावाने सुरु केलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत योजनेचा निधी आलेला नाही. धरणांच्या कामांना निधी सरकारने उपलब्ध करून दिलेला नाही. पुढील दोन महिन्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी देखील सरकारकडे पैसा राहणार नाही, अशी चिंता आ. एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.
खडसे पुढे म्हणाले की, जे रेग्यूलर कामे आहेत, त्यासाठी देखील आता सरकारकडे पैसा शिल्लक नाही, अशी परिस्थिती सध्या आहे. सरकार दररोज कर्ज काढत असून त्यावरील व्याज फेडत आहे. वास्तविक ४६ हजार कोटी रुपये लाडकी बहिण योजनेसाठी खर्च करतात, ही आनंदाची गोष्ट आहे ते सोशल वर्क आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही, मात्र, ४६ हजार कोटी पैकी ४ हजार ६०० कोटी रुपयांचा खर्च जर का धरणांवर केला असता तर आपल्या जिल्ह्यातील १० धरणे पुर्ण झाले असते आणि शेतकरी समृध्द झाला असता. उत्पादक खर्चासाठी निधी खर्च करा ना, त्यासाठी कर्ज काढले तर यातून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळेल, त्यातून शेतकरी समृध्द होवून विकासाला चालना मिळेल, असे मत आ. खडसे यांनी व्यक्त केले. महागाईमुळे जनता त्रस्त आधीच सरकाने १८ टक्के जीएसटी लागू करून १८ टक्के महागाई वाढवली. लाडकी बहिण योजनेसाठी ३ हजार कोटींचं कर्ज काढण्याचे सरकारचे नियोजन असून आता सरकारने लाडकी बहिण योजनेसाठी २५ रुपयांनी खाद्य तेलाचे दर वाढविले आहे. या महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे, अशी टीका आ. खडसे यांनी सरकारवर
केली.