जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नशिराबाद नगरपरिषदेमध्ये मूलभूत समस्या सोडविण्यासाठी पूर्ण वेळ प्रशासक मिळावा, अशी मागणी नशिराबादकरांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्याकडे निवेदन देऊन केली.
निवेदनात म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद या ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर परिषदेमध्ये झाले व कोरोना प्रादुर्भावामुळे निवडणुका लांबणीवर असल्याने प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. पूर्णवेळ प्रशासक नसल्यामुळे गावातील समस्या सोडवण्यासाठी अडचणी येत आहे. पावसाळा सुरू असल्यामुळे गावातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावात प्रवेश होणाऱ्या प्रमुख दोन रस्त्यांसह गावातील वार्डा मधील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य वाढत आहे. परिणामी अपघाताचा धोका आहे. गटारींची अस्वच्छता वाढत आहे. साथीचे आजारांचे रुग्ण वाढत आहेत. पावसामुळे पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंगूसह अन्य आजार फोफावत आहे. बसस्थानक चौकातील हाय मस्ट लॅम्प मधील गावात अनेक ठिकाणी पथदीप बंद आहे व भर पावसाळ्यात सहाव्या सातव्या दिवशी दूषित पाणीपुरवठा होत आहे व नियोजना अभावी पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. समस्या मांडाव्या तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावाचा विकास खुंटलेला आहे. मूलभूत समस्या सोडविण्यासाठी पूर्ण वेळ प्रशासक मिळावा, असे यात म्हटले आहे.
यावेळी प्राध्यापक विश्वनाथ महाजन यांनी गावातील विविध समस्यांवर निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांच्याशी चर्चा केली व निवेदन दिले. तसेच स्वयम् शोध फाउंडेशन च्यावतीने फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोलते, नरेंद्र धर्माधिकारी, प्रा. विश्वनाथ महाजन, नीरज चीतोडे, अंशुल पिंगळे, सौरभ चौधरी, अक्षय वाणी, तेजस बारूद वाले, सागर मोरे आदी उपस्थित होते.















