पंढरपूर (वृत्तसंस्था) राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे, असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्याची भरभराट होऊ दे, असंही अजित पवारांनी विठुरायाला साकडे घातले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. त्यानंतर ते बोलत होते. आषाढी राज्यावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊ दे , कोरोनाची लस लवकर उपलब्ध होऊन जगाची यातून सुटका कर असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातले. आज पहाटे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी कवडूजी भोईर व कुसुमाबाई भोईर हे मानाचे वारकरी दाम्पत्य महापूजेत सामील झाले होते. कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आकर्षक सुंदर फुलांनी सजवण्यात आले आहे. पहाटे उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यासाठी पुण्यातील भाविक राम जांभूळकर यांनी मंदिरात पुष्प सजावट केली. पिवळा, केशरी झेंडू, पांढरी शेवंती, जरबेरा लाल, पिवळा, पांढरा, केशरी आणि ऑर्किड अशा फुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी आणि सभामंडपाला फुलांची आरास करण्यात आली. सध्या राज्यातील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे , शेतकरीही अडचणीत आलाय अशावेळी लवकरात लवकर कोरोनाची लस आल्यास जगाला व राज्याला दिलासा मिळेल असे अजित पवारांनी महापूजेनंतर बोलताना सांगितले. यावेळी येताना यात्रा अनुदानाचा चेक घेऊन आल्याचे सांगताना आषाढीच्यावेळी दिलेल्या चेकचे पैसे जमा झाले नव्हते ही आमची चूक असल्याने ती आता दुरुस्त केल्याचे अजित पवारांनी सांगितले.
आज पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार आपली पत्नी व दोन्ही मुलांसह विठ्ठल मंदिरात दाखल झाले. यानंतर चौखांबी येथे संकल्प सोडून अजित पवारांच्या हस्ते विठूरायाची षोडशोपचारे पूजा करण्यात आली. यानंतर तीन वाजता रुक्मिणी मातेची पूजा संपन्न झाली . यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील सपत्नीक उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडक मान्यवरांनाच मंदिरात महापूजेसाठी प्रवेश देण्यात आला होता. विशेष म्हणजे २०१२ आणि २०१३ मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असतानाही, त्यांना कार्तिकी एकादशीला महापूजेसाठी येता आले नव्हते. त्यामुळे तब्बल नऊ वर्षांनी अजित पवारांनी विठ्ठल-रूक्मिणीची महापूजा केली. दरम्यान कोरोनाचे संकट दूर होऊ दे. तसेच कोरोनावरची लस लवकर येऊ दे, अशी प्रार्थना यावेळी अजित पवारांनी विठ्ठल चरणी केली.