नशिराबाद (प्रतिनिधी) शहरातील नागरिकांना कृत्रीम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरातील लोकांचा सहनशिलतेचा फायदा नगरपरिषद प्रशासन उचलत आहे. त्यामुळे नशिराबादचा पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास ‘घाघर मोर्चा काढण्याचा ईशारा एका निवेदनाद्वारे नागरिकांनी दिला आहे.
मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराच्या आजूबाजूला असलेल्या पाणी स्त्रोतातून शहराची तहाण भागेल इतका पाणीसाठा असल्यावर सुध्दा नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वाघुर नदीवरील बेळी गावात असलेली पाणी पुरवठा योजना तसेच मुर्दापूर धरणाजवळील पाणी पुरवठा योजना, पेठ भागात असलेल्या विहीरीवरून येत असलेले पाणी ही स्त्रोत शहरातील नागरिकांना पाणी पुरवू शकतात. तसेच शेळगाव येथून केलेली पाणी पुरवठा योजना निव्वळ विजेच्या थकबाकीपोटी बंद आहे.
शेळगाव बॅरेज येथे पाणी थांबले असल्याने येथून केलेली योजना नशिराबाद शहरास पाणी पुरवठा करण्यास सक्षम असल्याने विज बिल भरून सदरचे कनेक्शन सुरू करण्यात यावे व नागरिकांचे हाल थांबविण्यात यावे. शेळगाव येथून केलेली योजना ही विज बिला अभावी बंद ठेवून नगरपरिषद प्रशासन नशिराबाद शहरावर कृत्रीम पाणी टंचाई लादत आहे. त्यामुळे नागरिकांना 12 दिवस पाण्याची वाट पहावी लागत आहे. या सर्व परिस्थितीस नशिराबाद नगरपरिषद प्रशासन जबाबदार आहे.
विज वितरण कंपनीकडे नगरपरिषदेचे व मागील कालखंडातील ग्रामपंचायतीचे लाखो रूपये घेणे बाकी आहे. सर्व येणे घेवून त्यांचे विज बिल अदा केल्यास शेळगांव येथून पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकेल व कृत्रीम पाणी टंचाई संपेल. या निवेदनाद्वारे आम्ही आपणांस विनंती वजा सूचना करतो की, शेळगांव येथील योजना सुरू करून नशिराबाद शहरास सुरळीत पाणीपुरवठा करावा. अन्यथा नागरिकांची सहनशक्ती संपून काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील. येत्या 5 जुन 2023 पर्यंत नशिराबाद शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही नागरिकांच्या रास्त मागणीकरीता दि. 6 जुन 2023 रोजी नगरपरिषद नशिराबाद कार्यालयावर सकाळी 11.00 वाजता “घाघर मोर्चा” आणू,असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना पंकज महाजन, चैम्मद बरकत अली सैय्यद इंफ, देवेंद्र हेमराज पाटील, सादीक शाह बशीर शाह आदी उपस्थित होते.