जळगाव (प्रतिनिधी) ‘महापालिकेच्या निवडणुकीत शहरासाठी १०० कोटी आणू, २०० कोटी आणू अशा वल्गना भाजप नेते गिरीश महाजन यांनी केल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी शहराची वाट लावली’, अशी घणाघाती टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर केली.
जळगाव शहर महापालिकेसाठी जाहीर झालेल्या निधीची माहिती देण्यासाठी रविवारी दुपारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली. आम्ही जळगाव शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ६१ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. या निधीतून सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामे करण्यावर भर दिला आहे. शहराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, गेल्या काळात पालकमंत्री असताना भाजपचे चंद्रकांत पाटील किंवा गिरीश महाजन यांनी शहरासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून किती रुपये दिले याची आकडेवारी दाखवावी. मी एका वर्षात ६१ कोटी रुपये देऊ शकतो. तर यांनी काय दिले ते जाहीर करावे. तेव्हा तर गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांजवळ बसत होते. ते निधी आणू शकत होते. पण त्यांनी जिल्ह्यासाठी काहीही केले नाही, असा आरोपही मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केला.
जिल्हा नियोजन समितीमधून एका वर्षातच ९७ टक्के निधी हा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वाटप केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीला मान्यता देणारा मी पहिलाच पालकमंत्री असल्याचा दावादेखील त्यांनी केला. आम्ही विकासाचे राजकारण करतो, केवळ वल्गना करत नाही. जामनेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव अशा तालुक्यात देखील आम्ही निधीचे वाटप केले आहे. त्या नगरपालिकेत भाजपची सत्ता असली तरीही निधी वाटपात कुठलाही भेदभाव केला नाही. मात्र, गिरीश महाजन हे निधी वाटपाच्या वेळेस केवळ भाजपच्याच लोकप्रतिनिधींचा विचार करत होते, असाही आरोप ना. गुलाबराव पाटील यांनी केला.















