मुंबई (वृत्तसंस्था) “मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात. आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या, अन्यथा विष पिऊन मरु द्या,” असा इशारा मराठा आरक्षण चळवळीचे मुख्य प्रवर्तक खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून आरक्षणासंदर्भात विविध नेत्यांच्या भेटी घेत असलेल्या उदयनराजे यांनी आता ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात का? मराठा समाजातील लाखो तरुण निराशेच्या गर्तेत आहेत. आरक्षणाचा प्रश्न आता सुटला नाही तर तो कधीच सुटू शकत नाही याची जाणीव मराठा समाजातील तरुणांना झाली असून सरकारने गांभीर्याने घेतले नाही तर मराठा समाजातील तरुण वेगळे पाऊल उचलू शकतात. आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या अन्यथा विष पिऊन मरु द्या. असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
उदयनराजे यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून भूमिका मांडली आहे. “महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. इतर समाजांना आरक्षण देताना गांभीर्याने विधानं करणारे व कायदेशीर बाजू पुरेपूर लावून धरणारे सत्ताधारी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये मात्र मेखा मारुन बसले आहेत. अलिकडे होत असणाऱ्या बैठकांमध्येही मला फारसे गांभीर्य दिसत नाही,” असं उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
“आजपर्यंत ४० पेक्षाही जास्त मराठा बांधवांनी आरक्षणाच्या प्रश्नासाठी बलिदान दिले आहे. आरक्षणासाठीचा रस्त्यावरचा संघर्ष देशाने पाहिला आहे. मराठा समाज क्रांती मोर्चा दरम्यान रस्त्यावर उतरला होता. न्यायालयात कायद्याला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने जी पावले उचलायला हवी होती ती पावले का उचलली नाहीत? या कायद्याला स्थगिती दिल्यानंतर सरकारने केलेली कार्यवाही सदोष होती. कायद्याला मिळालेली स्थगिती उठवायची असेल, तर आदेशाच्याविरोधात रिव्ह्यू पिटिशन का दाखल केले नाही? राज्य सरकारने सुधारित अर्ज का दाखल केला. जेव्हा अर्ज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस आला तेव्हा कोणतीही बाजू न मांडता आम्हाला सुनावणी घटनापीठासमोर करायची असल्याचे राज्य सरकारने न्यायलयाला का सांगितले? त्यानंतर जेव्हा घटनापीठासमोर सुनावणी सुरु झाली, तेव्हा आपली तयारी नसल्याचे सांगून सरकारने तयारीसाठी वेळ का मागितला? हा घटनाक्रम पाहिला तर राज्य सरकारमध्ये बसलेले मराठा आरक्षणासंदर्भात किती उदासिन आहेत हे लक्षात येते. त्यामुळे राज्यकर्त्यांबाबत मराठा समाजातील तरुणांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे,” असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे.
“अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानही याबाबत कोणतेही सुतोवाच होत नाही. याचा अर्थ तुम्हाला मराठा आरक्षण द्यायचेच नाही. मराठा आरक्षण या विषयावर एककलमी कार्यक्रम हातात घ्या. कोरोनाने तुम्हाला भरपूर वेळ दिला आहे. हा वेळ समाजाच्या प्रश्नासाठी द्या. तातडीने मराठा समाजाच्या आरक्षणाचा निकाल लावा, नाहीतर आम्हाला हे जमणार नाही, असे जाहीर करुन खुर्च्या खाली करा. अन्यथा हे लाखो तरुण तुम्हाला कटकारस्थानाने मिळवलेल्या सिंहासनावरुन खाली खेचतील,” असा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे.