जळगाव (प्रतिनिधी) दोन वर्षांपासून पगार होत नसल्याने शहरातील नाथवाडा येथील शिपाई मुलाला न्याय मिळावा, या मागणीसाठी त्याच्या वडीलांनी आज जिल्हा परिषदेत शिक्षण उपसंचालकांची भेट घेतली. हात जोडून विनंती करणार्या मुक्या बापाला पाहून शिक्षण उपसंचालकांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
राजेंद्र वामन जोशी (रा. नाथवाडा, जळगाव) यांनी २०१९ मध्ये नूतन मराठा महाविद्यालयातून संस्थेच्या चोपडा तालुक्यातील हातेड येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात बदली झाली. जोशी त्याठिकाणी रुजूही झाले. मात्र त्यांचा तब्बल २०१९ ते आजपर्यंतचा पगारच मुख्याध्यापकाने दिलेला नाही. त्यांनी याबाबत तक्रारींवर तक्रारी केला. मात्र कुंभकर्णी झोपेतील जिल्हा प्रशासनाला जाग आली नाही. २ वर्षांपासून केलेल्या तक्रारींना माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकारी कर्मचार्यांनी केराची टोपली दाखविली. पगार मिळण्यासाठीचा संघर्ष करत असतांना दुसरीकडे ते कॅन्सरने ग्रस्त झाले. एकीकडे कॅन्सरसोबत तर दुसरीकडे पगारासाठी प्रशासनासोबतचा त्यांचा लढा सुरु झाला.
याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांना कळाले. नेमके योगायोगाने शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी हे जिल्हापरिषदेत वार्षिक तपासणीनिमित्ताने आले होते. रविंद्र शिंदे यांनी कॅन्सरने पिडीत राजेंद्र जोशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज मळकटलेल्या कपड्यातला तसेच बोलता न येणारा मुका असलेल्या बापाला सोबत घेत, जिल्हा परिषद गाठली. याठिकाणी परिस्थितीसमोर हरलेल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मुका बापाने शिक्षण उपसंचालकांकडे न्याय मिळण्याची मागणी केली. मुक्या बापाला पाहून शिक्षण उपसंचालकांनी तत्काळ शिक्षणाधिकार्यांना याप्रकरणात कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच संबंधितास पगार मिळवून देण्याचे आश्वासन दिले.