जळगाव (प्रतिनिधी) – “शासकीय कार्यालय हे लोकांना आपल्याला न्याय मिळेल, अशी भावना असलेलं ठिकाण असतं. जिथे येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्याला निराशा येणार नाही, असे उत्तम काम अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या हातून व्हावं,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात उत्तम काम करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या कार्याचा विशेष गौरव त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
महसूल विभागासाठी तयार केलेला १० दिवसांचा कृती आराखडा हे केवळ घोषणापत्र नसून, शिवकालीन सुशासनाच्या तत्त्वांवर आधारित एक आधुनिक धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आराखड्यात शेतरस्त्यांच्या अडथळ्यांचं निवारण, जिवंत नोंदींचे अद्ययावतीकरण, थकबाकी वसुली, ‘हर घर संविधान’ मोहीम व ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’ यांचा समावेश असल्याची माहितीही त्यांनी दिली. फक्त काम न करता, वैशिष्ट्यपूर्ण काम करा, जेणेकरून ‘जळगाव’ हे नाव संपूर्ण राज्यात आदराने घेतलं जाईल अशा शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला अधिक चालना दिली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा विशेष गौरव
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना उद्देशून पालकमंत्री म्हणाले, “त्यांच्या नावातच ‘प्रसाद’ आहे आणि त्यांच्या कामातून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्यायरूपी प्रसाद मिळतो आहे.”
यावेळी जिल्हाधिकारी यांना मुख्यमंत्री यशस्वी १०० दिवस कार्यप्रणाली प्रमाणपत्र, ‘तरुण तेजांकित’ व ‘बालस्नेह’ पुरस्कार मिळाल्याचाही गौरवपूर्ण उल्लेख पालकमंत्र्यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी करताना पुरस्कारार्थ्यांची नावे जाहीर केली. सूत्रसंचालन अव्वल लिपिक कविता पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी मानले.
या सोहळ्याला आ. राजूमामा भोळे, पाचोरा विधानसभेचे आमदार किशोरआप्पा पाटील उपस्थित होते. त्यांनीही जिल्हाधिकारी व महसूल विभागाच्या कामगिरीचे कौतुक केले. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या समन्वयातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होत असल्याची भावना व्यक्त केली.
या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, “हे माझे एकट्याचे कार्य नसून, जिल्ह्यातील प्रत्येक अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फलित आहे. या गौरवाने सर्वांना अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळेल.
महसूल विभागातील उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख, वन विभाग, मुद्रांक शुल्क यासह महसूल विभागांतर्गत येणाऱ्या सर्व विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दुर्दैवी पहलगाम हल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सहवेदना व्यक्त करण्यात आल्या.