जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, तथा शिवसेना नेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी दुपारी वणी (जि.नाशिक) येथे सप्तश्रृंगी गडावर जावून देवीचे दर्शन घेत महाआरती केली. ना. पाटील हे देवीचे आर्शिवाद घेतल्यानंतर मुंबईच्या दिशेने दसऱ्या मेळाव्याला रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोजित दसरा मेळावा मुंबईत होणार आहे. त्यासाठी जळगाव जिल्हयातून हजारो कार्यकर्ते जाणार आहेत. काही कार्यकर्ते आज विविध प्रकारच्या वाहनांनी रवाना झाले. त्यांनी देखील आज सप्तश्रृंगी गडावर देवीचे दर्शन घेतले. ते नाशिक व गडावर आज मुक्काम करून नंतर मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. तर काही कार्यकर्ते ४ तारखेला जळगाववरून वाहनांनी जाणार आहे. जिल्ह्यातून अनेक चारचाकी वाहने, खासगी बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत.
















