मुंबई प्रतिनिधी । करोनामुळे राज्याचा गाडा विस्कळीत झाला असून, आर्थिक ताण वाढत चालला आहे. त्यामुळे राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्याच्या दिशेनं राज्य सरकारनं मोठं पाऊल टाकलं आहे. राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. यानुसार आता राज्यात हॉटेल, बार, रेस्टॉरंट ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मात्र, हॉटेल, बार, रेस्टॉरंटमध्ये ५०% क्षमतेनेच सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.
शाळा, महाविद्यालय बंदच राहणार
राज्यातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस हे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार असल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. यासोबतच राज्यातील सिनेमागृह, स्विमिंगपूल, थिएटर, इंटरटेन्मेंट पार्क हे सुद्धा बंद राहणार आहेत. तसेच मेट्रो सेवा सुद्धा बंद राहणार आहे. तर सर्वसामांन्यांसाठी लोकल सेवा कधी सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाहीये.
राज्यात अनलॉक ५ संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर
हॉटेल, बार, रेस्टॉरंट ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार
५० % क्षमतेने हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी
डबेवाल्यांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास परवानगी
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवणार
पुणे विभागातील लोकल सेवा सुरू होणार आहे
डबेवाल्यांसाठी क्यूआर कोड देण्यात येणार