जळगाव (प्रतिनिधी) एकाचवेळी ४० आमदार फुटतात ही आजची आग नाही. त्यामुळे त्यांची नाराजी समजून घ्यायला पाहिजे होती. आमच्याकडे नितीन गडकरी साहेबांच्या कार्यक्रमाच्या वेळी उपजिल्हाप्रमुख भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती कळाली. रात्रभर त्यांची समजूत काढली, नाराजी दूर केली, असा किस्सा शिवसेना बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत सांगितला. दरम्यान, हे उपजिल्हाप्रमुख धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांच्या बाबतीतला होता. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर ते बोलत होते.
असा होता पी. एम. पाटील यांच्या नाराजीचा किस्सा !
एकाचवेळी ४० आमदार फुटतात, या मुद्द्याला धरून गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत जळगावचा एक किस्सा सांगितला. नितीन गडकरी साहेबांच्या कार्यक्रमाच्या वेळी उपजिल्हाप्रमुख भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती कळाली. रात्रभर त्यांची समजूत काढली, नाराजी दूर केली. यावरूनच तो उपजिल्हाप्रमुख कोण? अशी चर्चा सुरु झाली होती. धरणगावचे माजी नगराध्यक्ष तथा उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील हे स्थानिक गटबाजीमुळे नाराज होते. अगदी त्यांनी आपल्या उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा वरिष्ठ नेत्यांना देखील टाकून दिला होता. ही गोष्ट गुलाबराव पाटील यांनी कळताच त्यांनी स्वत: त्यांची समजूत काढली. स्थानिक पदाधिकाऱ्यांना पी. एम. पाटील यांना भेटायला पाठवले. पी. एम. पाटील यांची नाराजी समजूत घेत, ती दुर केली होती. यानंतर पी. एम. पाटील यांनी आपला राजीनामा मागे घेतला होता. दरम्यान, गुलाबराव पाटील यांचा सांगायचा मुद्दा एवढाच होता की, आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला जपतो आणि दुसरीकडे आमदारांची नाराजी ऐकून घ्यायला वेळ रहात नाही, यातच बंडाचे मूळ लपलेले आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा मतदार संघात परत जाऊ त्यावेळी जनता आमचे स्वागतच करेल, असेही श्री. पाटील म्हणाले.
ज्यांची निवडून येण्याची लायकी नाही ते आम्हाला बोलतात
चार लोकांच्या टोळक्यानं उद्धव ठाकरेंना वहावत नेले. पट्टी बांधून तुम्हाला धृतराष्ट्राप्रमाणे सांगत आहे त्यांना दूर करा. याआधी नारायण राणे, भुजबळ, राज ठाकरे गेले तेव्हा उठाव झाला, मग आता काय झालं? आम्ही सत्तेतून बाहेर जातो तरी बंडखोर आहे म्हणता. तुम्ही आम्हाला पुन्हा घरट्यात, मातोश्रीवर या सांगायला हवे होते. ज्यांची निवडून येण्याची लायकी नाही ते आम्हाला बोलतात, असा प्रत्यक्ष टोला त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला. मी आणि काही आमदारांनी सांगितले की, शिंदे साहेबांचे म्हणणे ऐकून घ्या, त्यांची नाराजी समजून घ्या. पण उलट आम्हाला सांगितले जाते की, तुम्हालाही त्यांच्या सोबत जायचे असेल तर जा.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, शिवसैनिक असो की, पदाधिकारी आम्ही प्रत्येकाची काळजी घेतो आणि दुसरीकडे काही जण आम्हाला सांगतात तुम्हाला पक्ष सोडून जायचे असेल तर तुम्ही पण जाऊ शकतात. एकाचवेळी एकाचवेळी ४० आमदार फुटतात, त्यांना विचारायला नको. त्यांची नाराजी जाणून घ्यायला नको?, असा सवाल यांनी श्री. पाटील यांनी उपस्थित केला. आम्ही बंड नाही तर उठाव केला. आम्ही शिवसेना सोडली नाही, असेही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
मी नाराज होतो. पंरतू माझी नाराजी जशी भाऊंना कळाली, तसाच त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधला. माझे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले. माझ्या भावना समजून घेतल्या. खरं म्हणजे तेव्हा मला मोठं कौतुक वाटलं. राज्याचे कॅबिनेट मंत्री असून सुद्धा आपल्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी गुलाबभाऊ एवढी काळजी घेताय. म्हणूनच भाऊंच्या निर्णयाचं मी सर्वात आधी स्वागत केलं. माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याचा किस्सा थेट विधानसभेत सांगितल्यामुळे मी भारावून गेलोय.
– पी.एम.पाटील (माजी नगराध्यक्ष धरणगाव, तथा उपजिल्हाप्रमुख, जळगाव)















