धरणगाव (प्रतिनिधी) शिवसैनिकांनो, डगमगू नका, एक गुलाबराव गेला म्हणून काय झाले, तुम्ही अर्ध्या रात्री फक्त हाक द्या, दुसरा गुलाबराव पक्षासाठी व तुमच्यासाठी निरंतर तत्पर आहे. तर गुलाबराव वाघ विधानसभेसाठी तयारी लागावे, असा स्पष्ट संदेश संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिला.
शहरातील श्रीजी जिनींग येथे शिवसेनेचा तालुका मेळावा नुकताच घेण्यात आला. यावेळी अनेक शिवसैनिकांची होती. त काही जण उपस्थित नव्हते. जिल्ह्यातील चार आमदारांनी बंडखोरी करुन शिंदे गटात समावेश केला आहे. याचा कोणताही परिणाम पक्षावर होऊ नये म्हणून आता मेळावे पार पडत आहेत. त्याच अनुशंगाने शहरातील एका जीनिंग मध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला होता. यामध्ये तालुकाभरातील शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश चौधरी यांनी सांगितले की, एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झालेल्या बंडखोर आमदारांमुळे पक्षावर कोणताच परिणाम होणार नाही. उलट आम्ही अधिक ताकदीने लढू. आम्ही ३५ वर्षापासुन शिवसेनेसोबत आहोत. आम्ही इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांसोबत कदापी राहणार नाहीत. आम्ही बंडखोरांसमोर लढण्याचा निर्धार केला आहे. असेही श्री. चौधरी म्हणाले.
तद्नंतर उत्तर महाराष्ट्र सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या भूमिकेचा परिणाम हा ना पक्षावर होणार आहे ना स्थानिक पातळीवरील शिवसैनिकावर. उलट अजून जास्त ताकदीने शिवसैनिक हा मैदानात उतरणार असून महाराष्ट्रतील शिवसैनिक कालही उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते आजही आहेत आणि उद्याही राहतील, अशी ग्वाही श्री.वाघ यांनी दिली. परत आले तर निश्चितच स्वागत असेल, नाहीतर शिवसेनेच्या विरोधात गेले त्यांच्यासोबत आमचे वैर असणार आहे. असेही श्री.वाघ यांनी सांगितले.
संपर्क प्रमूख संजय सावंत यांनी मेळावाप्रसंगी म्हणाले की, शिवसेना पक्षाला कोणीही संपवू शकत नाही, आजही बाळासाहेबांची शिवसेनेवर शिवसैनिकांची निष्ठा आहे. शिवसेना हा खऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. गद्दारांना पक्षात स्थान नाही. पुढे म्हणाले की, गुलाबराव पाटलांना शिवसैनिकांनी डोक्यावर घेतले. खूप मोठ्ठे केले आणि तेच गुलाबराव आता शिवसैनिकांची डोके कापण्यास निघाले आहेत. शिवसैनिकांनो, डगमगू नका, एक गुलाबराव गेला म्हणून काय झाले, तुम्ही अर्ध्या रात्री फक्त हाक द्या, दुसरा गुलाबराव पक्षासाठी व तुमच्यासाठी निरंतर तत्पर आहे. असेही श्री. सावंत यांनी सांगितले. या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक अॅड.शरद माळी, तालुकाप्रमुख गजानन पाटील, जळगांव महानगरप्रमुख शरद तायडे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते विनय भावे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, जेष्ठ नेत्या जनाआक्का पाटील, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, सरीता माळी, कल्पना कापडणे, रत्ना धनगर, रेखा चौधरी, भारती चौधरी, माजी सभापती दिपक सोनवणे, विकासो चेअरमन उमेश महाजन, उद्योजक जिवनसिंह बयस यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण अग्निहोत्री यांनी केले तर आभार विनोद रोकडे यांनी मानले