जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी २० ते २२ मिनिटे गारपीट झाली. जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे दोघांचा कंटेनरखाली दबून मृत्यू झाला. तर चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे वीज पडून ९ बकऱ्या दगावल्या.
फत्तेपुरसह परिसरात पडली लिंबाच्या आकाराची गार !
जामनेर तालुक्यातील फत्तेपूरसह परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार गारपीट झाली. लिंबूच्या आकाराच्या गारीमुळे फळबागा, केळीसह रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे केळी, मका या पिकांसह आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गेल्या महिन्याभरात जामनेर तालुक्यात पाच वेळा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यात गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील वेगवेगळ्या भागात गारपीट झाली. गुरुवारी फत्तेपुरसह परिसरात लिंबाच्या आकाराची गार पडली. त्यामुळे केळी, आंबा, मका, ज्वारी, बाजरी अशा पिकांचे प्रचंड नुकसान झाले. महसूल व कृषी विभागातर्फे पंचनामे केले जात असून योग्य ती भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
चोपडा तालुक्यात चक्रीवादळ !
चोपडा शहरासह तालुक्यात गुरुवारी सायंकाळी ६ ते ६.३० वाजेदरम्यान मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी, लहान विक्रेते, व्यापाऱ्यांसह सर्वांचीच धावपळ उडाली होती. बाजार समितीमध्ये आलेला माल, अनेक जिनिंगमध्ये पडलेला कापूस, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. चोपडा तालुक्यातील गरताड, कुरवेल, तावसे, संपुला, कठोरा, गोरगावले आदी परिसरात चक्रीवादळामुळे केळी व इतर पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
चहार्डीत मेंढपाळाचा मुलगा जखमी !
चोपडा तालुक्यातील चहार्डी शेतशिवारात वीज पडून चहाडी गावात मेंढी चारण्यासाठी आलेल्या दादा भीला कलमुडे (रा. घाणेगाव) यांच्या मालकीच्या एकूण ९ मेंढ्यांचा मृत्यू झाला. तर मेंढपाळाचा मुलगा देखील किरकोळ जखमी झाला आहे. यामुळे मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच चहार्डी येथील दूध डेअरीचे चेअरमन जगदीश निंबा पाटील यांची कांद्याची चाळ शेतातून उडून गेल्याने त्यांचे ही मोठे आर्थिक नुकसान झाले.
जळगावात दोघे ठार !
तालुक्यातील चिंचोली गावानजीक गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे उभा रिकामा कंटेनर पलटी झाल्याने कंटेरनच्या आडोश्याला उभे असलेल्या दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी आहे. या दुर्घटनेत भोला श्रीकुसूम पटेल (रा. सानीकावा जि. सिवान बिहार) आणि चंद्रकांत वाभळे (वय-५२ रा. चाळीसगाव ह.मु. पुणे) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नावे आहे. तर या घटनेत अफरोज आलम (वय-२३ रा. कुंडाळे जि. पुरण्या बिहार) हा जखमी झालाय.
भुसावळात दुसऱ्या दिवशीही गारपीट
भुसावळ शहरासह परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अर्ध्या तासात ८ मिमी पावसाची नोंद झाली असून पावसासोबत बोराच्या आकाराची गारपीट होती. आमोदा ते बामणोद रस्त्यावर वादळामुळे २० झाडे उन्मळून पडल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली होती. वांजोळ्यात झाड कोसळून दोन बैल जखमी झाले.
शेतात बैलजोडीवर झाड कोसळून दोन बैल जखमी
वांजोळा, साकेगाव, चोरवड, खडका, किन्ही या भागात दहा मिनिटे गारपीट झाली. तर भुसावळ शहरात ४० मिनिटे पाऊस झाला. वांजोळा येथे दिनकर रामा गिरनारे यांच्या शेतात बैलजोडीवर झाड कोसळून दोन बैल जखमी झाले. साकेगावला काही घरांची पत्रे उडून गेली. वादळामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. भुसावळातील भोईनगर परिसरातही गुरुवारी दुपारपासून खंडित झालेला विजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरु झालेला नव्हता.
यावलला पाऊस,फैजपूर परिसराला गारपिट !
यावल तालुक्यात गुरूवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. फैजपूरजवळील साखर कारखाना परिसरात गारपीट झाली. यामुळे केळीसह परिसरातील आंबा, जांभूळ, पपई आदी फळबाग तसेच केळी पिकाला फटका बसला आहे. आमोदा परिसरातही गुरुवारी दुपारी ३ वाजेदरम्यान गारपीट व अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे केळी बागांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील पत्रे उडाली होती.