सांगली (वृत्तसंस्था) उन्हाळी सुट्टीसाठी मावशीच्या गावी गेलेल्या मुलाचा मावसभावासह नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील तांदुळवाडी येथे घडली आहे. अमोल प्रकाश सुतार (वय १६) आणि रविराज उत्तम सुतार (वय १२),अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोघा मावस भावांची नावे आहेत. दोघांच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांनी मन हेलावून सोडणारा आक्रोश केला.
शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास अमोल आणि रविराज हे दोघं जण वैरण काढायला वारणा नदीकाठावर गेले होते. वैरणीचे चार मोदळे काढून झाल्यावर दोघे पोहण्यासाठी नदीच्या पात्रात उतरले. दोघांनाही पोहायला येत नव्हते. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. सायंकाळ पर्यंत दोन्ही मुले घरी आली नाहीत म्हणून पालकांनी त्यांचा शोध घेतला असता नदीकाठी चप्पल, कपडे आणि त्यांचे मोबाईल आदि वस्तू मिळाल्या. दोघांचा नदीकाठी शोध घेण्यात आला मात्र रात्रीच्या अंधारामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली.
शनिवारी सकाळपासून बेपत्ता मुलांचा पुन्हा शोध सुरू केला असता. लाईफ फाऊंडेशन रेस्क्यू फोर्सच्या बचाव पथकाला मालेवाडी जॅकवेलजवळ दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. या टीमने दोघांचेही प्रेत पाण्यातून बाहेर काढलेत. दोघांचे मृतदेह बघताच कुटुंबियांनी मन हेलावून सोडणारा आक्रोश केला. सख्या मावस भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने या दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, अमोल सुतार हा इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. नुकतीच त्याने दहावीची परीक्षा दिली होती. आई वडिलांना तो एकुलता एक होता. तर रविराज सुतार हा इयत्ता सातवीमध्ये शिकत होता.