वर्धा (वृत्तसंस्था) शहरालगतच्या पिपरी (मेघे) गावाशेजारी असलेल्या नवनिर्मित तुळजाभवानी मंदिरावर बुधवारी सकाळी झेंडा चढविण्याकरिता चढलेले तीन भाविक शॉक लागल्याने ठार झाले. तर इतर दोघे बचावले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
मृतकांमध्ये पिपरी येथील रहिवासी अशोक विठोबा सावरकर (५६), अशोकसिंग उर्फ बालू नारायणसिंग शेर (६०) व बेला येथील रहिवासी सुरेश भास्कर झिले (३५) यांचा समावेश आहे. वर्धा – आर्वी मार्गावरील पिपरी (मेघे) गावाशेजारी तुळजा भवानी मंदिर आहे. येथे शहरासह ग्रामीण भागातील असंख्य भाविक पूजेसह दर्शनाकरिता येतात.
अनेक भाविक मंदिरात नियमित दर्शनाकरिता येणारे आहेत. तेच येथे सेवा देतात. बेला येथील रहिवासी असलेले सुरेश झिले हे शिक्षा मंडळाचे कर्मचारी असल्याचे कळते. अशोक सावरकर हे पिपरी ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी होते. अशोक शेर हे शेतकरी असून ते मंदिरात नियमित सेवा द्यायचे. बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मंदिरावर झेंडा चढविण्याकरिता तयार झाले. दरम्यान, मंदिराशेजारी वीजवितरण कंपनीची सर्विस लाइन आहे. पिपरी येथील दिनेश गायकवाड व किशोर हंसराज यांच्या मदतीने भगवा झेंडा मंदिराच्यावरील भागात त्यांना लावावयाचा होता.
यासाठी त्यांनी झेंडा लावण्याकरिता लोखंडी पाइपचा वापर केला. मंदिरातील कळसावर झेंडा लावायला ते २५ फूट उंचीच्या खांबावर चढले. मात्र, त्यांचा तोल गेला. लागूनच असलेल्या ३३ केव्हीच्या विजेच्या तारांचा त्यांना स्पर्श झाला. विजेचा जबर धक्का बसल्याने ते मंदिराच्या शेडवर आदळले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी लाकडी टेबलवर उभे असलेले नामदेव व किशोर या दोघांनी उड्या घेतल्या. त्यामुळे ते बचावले. घटना लक्षात येतात तीनही जखमींना सेवाग्राम येथे रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांसह वीजवितरण कंपनीला देण्यात आली.
अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून प्राथमिक तपास केला. रामनगर पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार महेश चव्हाण करीत आहे. दोन मृतकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तर एकावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.