मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरुन घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दखल घेतली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी यानंतर पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना महत्वाचे आदेश दिले आहेत. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भोंग्यासंदर्भात एकत्रित धोरण ठरवा असे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी हे धोरण ठरवावं असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितंल आहे. जातीय तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई करावी असेही आदेश त्यांनी दिले आहेत.
राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त एकत्रित बसून एक निर्णय घेणार घेतील, गाईडलाईन्स तयार करतील अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. पुढे ते म्हणाले की, “एक दोन दिवसात राज्यासाठी एकत्रित असं धोरण ठरवलं जाईल. मुंबईसह राज्यासाठी नोटीफिकेशन काढलं जाईल आणि त्यातून नियमावली जाहीर करण्यात येईल”.
मी अनेकदा सांगितलं आहे की, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. जाणीवपूर्वक कोणाकडून प्रयत्न झाला तर आणि त्याच्यात तो दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल मग ती संघटना असो, व्यक्ती असो किंवा आणखी कोणीही असो,” असंही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.