औरंगाबाद (वृत्तसंस्था) महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली. प्रेमविवाह केला म्हणून सख्या आई आणि भावानंच हत्या केली. या घटनेतील आरोपी भावाला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस निरीक्षकाकडून केला जात असल्याचा आरोप भाजप नेत्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे.
चित्रा वाघ यांनी नुकतेच मृत तरुणीच्या पतीच्या कुटूंबीयांना भेट दिली, त्यानंतर घडलेला प्रकार समोर आला आहे. ‘प्रेमविवाह करून सुखानं नांदत असलेल्या पोटच्या मुलीची खोट्या प्रतिष्ठेपायी आई आणि भावाने मिळून मुंडकं कापून हत्या केली.औरंगाबादच्या वैजापूरमधल्या या घटनास्थळी भेट दिली. ‘आरोपी मुलगा सज्ञान आहे परंतु त्याला अल्पवयीन दाखवण्याची धडपड सुरू आहे. यात पोलिस निरीक्षकाची भूमिका संशयास्पद आहे. राज्यात होणारे ॲानर किलींग सरकारसाठी आणि पोलिस यंत्रणेसाठी निंदास्पद आहे. तातडीनं सासरच्या लोकांना सुरक्षा पुरवण्याची विनंती पोलिसांना केली. ॲानर किलींग होऊ नये यासाठी जनजागृती मोहिम मोठ्या प्रमाणात राबवली जाण्याची गरज आहे त्यासाठी सरकारनं ठोस पाऊल उचलावं, ‘ असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी राज्यातील गुन्हेगारांच्या विरोधात कठोर पावले उचलण्याची विनंती केली आहे.