नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Helicopter Crash) दुर्दैवी मृत्यू झाला होता. बिपिन रावत यांच्यासह लष्करातील (Army) १४ अधिकाऱ्यांना देशाने गमावले. दरम्यान, आता हेलिकॉप्टर क्रॅशचं सत्य समोर आले आहे. हेलिकॉप्टर खराब हवामानामुळं क्रॅश झाल्याचं समितीच्या चौकशीतून समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर मार्शल मानवेंद्र सिंह कमिटीनं आपली चौकशी पूर्ण केली असून कायदेशीर सल्ला घेण्यासाठी कायदा विभागाकडे पाठवलं आहे. लवकरच यासंदर्भातील अहवाल वायुसेना प्रमुखांकडे पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, वायुसेनेच्या वतीनं अहवालाबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही. परंतु, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर क्रॅशच्या कारणांचा तपास करत असलेल्या कमिटीनं अहवालात म्हटलंय की, खराब हवामानामुळे वैमानिक ‘विचलित’ झाले असावेत, ज्यामुळे हा अपघात झाला. तांत्रिक भाषेत त्याला CFIT म्हणजेच ‘Controlled Flight Into Terrain’ म्हणतात. हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्रालयानं अपघाताचं कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.
हेलिकॉप्टर दुर्घटनेत लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांचा मृत्यू
लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन हवाई दलाचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होतं. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. १४ जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. प्राथमिक माहितीनुसार, बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंगटन इथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही सोबत होते. वेलिंगटनमध्ये आर्मीचं कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर नियोजित होतं. वेलिंगटनवरुन कुन्नूरला जाताना हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं.