नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात विवाहानंतर प्रचलित प्रथेनुसार, पत्नी पतीच्या घरी राहायला जाते. परंतु, सासरी एखाद्या महिलेला कुटुंबीयांकडून मारहाण झाली तर तिच्या जखमांसाठी मुख्यत: तिचा पतीच जबाबदार असेल, असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. यावेळी, एका प्रकरणात पत्नीला मारहाणीचा आरोप असलेल्या व्यक्तीला अटकपूर्व जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला.
सासरी एखाद्या महिलेला कुटुंबीयांकडून मारहाण झाली तर त्यासाठी मुख्यत: तिचा पतीच जबाबदार असेल असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात पत्नीला मारहाणीचा आरोप असलेल्या व्यक्तीला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पतीला खडे बोल सुनावले आहेत. न्यायालय ज्या व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी करत होतं, त्या व्यक्तीचा हा तिसरा विवाह होता तर संबंधित महिलेचा हा दुसरा विवाह होता. लग्नानंतर वर्षभरातच २०१८ मध्ये या जोडप्याला एक अपत्यही झालं होतं.
गेल्या वर्षी जून महिन्यात महिलेने लुधियाना पोलिसांत पती आणि सासरच्या व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती. हुंड्याची मागणी पूर्ण करू न शकल्याने पती, सासरे आणि सासू यांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप संबंधित महिलेनं केला होता. सर्वोच्च न्यायालयात पतीचे वकील कुशाग्र महाजन यांनी अटकपूर्व जामीन देण्यावर जोर दिला. ‘तुम्ही कशा पद्धतीचे पुरुष आहात? पत्नीच्या आरोपानुसार गळा दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच जबरदस्तीने गर्भपात करण्यात आला. पत्नीला क्रिकेटच्या बॅटनं मारहाण करणारे तुम्ही पुरुष आहात’ असं खंडपीठाने म्हटलं.
सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने जेव्हा एखाद्या महिलेचा सासरच्या घरी छळ होतो तेव्हा मुख्य रुपात ही जबाबदारी पतीची आहे असं म्हटलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने आरोपी पतीचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. याआधी पत्नी ही काही जंगम मालमत्ता किंवा वस्तू नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका आदेशात म्हटले आहे. तसेच, जर पतीसोबत राहण्याची पत्नीची इच्छा नसेल तर यासाठी पती तिच्यावर दबाव टाकू शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात सुनावणी करताना असा आदेश दिला. या याचिकेत पतीने अशी मागणी केली होती की, पत्नीने पुन्हा माझ्यासोबत राहावे आणि आम्ही पुन्हा एकत्र संसार करावा. सर्वोच्च न्यायालयात मधील न्या. संजय किशन कौल आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याला चांगलेच सुनावले. “तुम्हाला काय वाटतं?, पत्नी काय एखादी वस्तू आहे, जो आम्ही तिला अशाप्रकारचा आदेश देऊ? पत्नी काय जंगम मालमत्ता आहे का? तिने तुमच्यासोबत जाण्याचे आदेश आम्ही कसे देऊ शकतो?,” असे सवाल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारले आहेत.
मारहाणीमुळे दोन वेळा गर्भपात
महिलेच्या तक्रारीनुसार, १२ जून २०२० रोजी रात्री ९.०० वाजल्याच्या सुमारास पती आणि त्याच्या पित्यानं क्रिकेटच्या बॅटनं आपल्याला मारहाण केली होती. यामध्ये पतीच्या आईचाही सहभाग होता. मारहाणीनंतर पतीनं पत्नीची गळा दाबून हत्या करण्याचाही प्रयत्न केला. त्याच्या पित्यानं महिलेच्या चेहऱ्यावर उशी दाबून तिला मारण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर महिलेला रस्त्यावर फेकण्यात आलं. या घटनेची सूचना मिळाल्यानंतर महिलेचा पिता आणि भाऊ तिथं दाखल झाले आणि त्यांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत कायदेशीररित्या मेडिकोही केलं. सासरच्या घरी याआधीही झालेल्या मारहाणीमुळे आपला दोन वेळा गर्भपात झाल्याचा आरोप महिलेनं केला आहे.
तक्रारकर्त्या महिलेच्या मेडिको लीगल रिपोर्टनुसार, तिच्या शरीरावर १० गंभीर जखमा होत्या. यातील पाच तिच्या चेहऱ्यावर-डोक्यावर, योनिवर आणि एक गळ्यावरही जखमा होत्या. वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, १० पैंकी ८ जखमा या धारदार हत्यारामुळे झाल्या होत्या. या मेडिको अहवालामुळे महिलेच्या आरोपांना बळ मिळालं.