नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी लॉकडाऊन ते न्यायव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून मोदी सरकारला धारेवर धरणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. कोणतीही मागणी केलेली नसताना घरासमोर पोलीस तैनात करण्यात आले आहेत, असं मोईत्रा यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी त्यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पत्र दिलं आहे.
मोइत्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. दिल्लीतील शासकीय निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आलेल्या पोलिसांचा एक फोटो ट्विट करत आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महुआ मोइत्रा यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव आणि बाराखंबा रोड पोलीस स्टेशनचे एसएचओ यांच्याकडे आपल्या घराबाहेर तैनात असलेली सुरक्षा हटवण्यात यावी अशी मागणी केली आहे. पत्रामध्ये मोईत्रा यांनी बाराखंबा रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी (एसएचओ) शुक्रवारी त्यांना दिल्लीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेटले. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाचे तीन सशस्त्र जवान त्यांच्या घराच्या बाहेर नेमण्यात आल्याचं म्हटलं आहे. देशाची नागरिक म्हणून राइट टू प्रायव्हसी हा मला दिलेला मूलभूत हक्क असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
दिल्ली पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात महुआ मोईत्रा यांनी “सशस्त्र जवानांच्या हालचालींवरून असं दिसत आहे की, ते माझ्या हालचालींच्या नोंदी ठेवत आहेत. यातून मला असं जाणवतंय की मी एक प्रकारच्या पाळतीखाली आहे. मी तुम्हाला हे सांगू इच्छिते, देशाची नागरिक म्हणून राइट टू प्रायव्हसी हा मला दिलेला मूलभूत हक्क आहे” असं म्हटलं आहे. यासोबतच सुरक्षा काढून घेण्याची देखील मागणी केली आहे.
















